
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्यादित,चांगदेवनगर मळा येथील व्यवस्थापकीय कार्यालयात लेखी अर्ज सादर करून सन 1982 ते 2012 या तीस वर्षांच्या कालावधीतील थकीत खंड तात्काळ देण्याची मागणी जळगाव परिसरातील सर्व खंडकरी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली.

अर्जांमध्ये नमूद करण्यात आले आहे की, शेतकऱ्यांनी शेती महामंडळाच्या सर्व नियमांचे पालन करून जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली असून, शासनाने तीस वर्षापासून थकीत ठेवलेला त्यांच्या हक्काचा खंड देणे आवश्यक आहे.
यावेळी खंडकरी चळवळीचे नेते गंगाधर चौधरी म्हणाले,“सध्या शेती महामंडळ नफ्यात असूनही थकीत खंड देण्याबाबत शासन आणि महामंडळाकडून अनास्था दिसून येते. हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. जवळपास तीन दशकांपासून खंडकरी शेतकरी आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत, तरीही त्यांना न्याय मिळालेला नाही. शासनाने या विषयाकडे सकारात्मकतेने पाहून तात्काळ निर्णय घ्यावा.”शेतकऱ्यांचा विश्वास आहे की, शासनाच्या सकारात्मक दृष्टीकोनातून लवकरच प्रलंबित खंडाबाबत निर्णय घेतला जाईल आणि दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम मिळेल.या प्रसंगी जेष्ठ नेते गंगाधर चौधरी, दिलीप चौधरी, मच्छिंद्र चौधरी, गोरख चौधरी, भागवत चौधरी, गोपीनाथ चव्हाण, दत्तात्रय चौधरी, बापूसाहेब चौधरी, रामकिसन काळे आदी खंडकरी शेतकरी उपस्थित होते.




