
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा करण्याचे ध्येय समोर ठेवून स्नेहालय उडान प्रकल्प कार्य जिल्ह्यात सुरू आहे. यालाच आता जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन यांनी पाठबळ दिले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या पुढाकाराने १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा करण्याचे लक्ष्य ठेवून उडान अहिल्यानगर बालविवाह मुक्त अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या अभियानाची सुरुवात ग्रामपंचायत स्तरावर प्रभावी अंमलबजावणीसाठी नगर सकाळी 10 ते 1 आणि राहुरी तालुक्यात दुपारी 3 ते 6 पर्यंत एकाच दिवशी कार्यशाळांचे आयोजन करून करण्यात आली.नगर पंचायत समिती येथे झालेल्या कार्यशाळेत गट विकास अधिकारी दिलीप सोनकुसळे सर प्रमुख पाहुणे होते.तर नगर एकात्मिक बाल विकास अधिकारी मेहेत्रे सर त्यांनी नगर तालुका बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.राहुरी पंचायत समितीत झालेल्या कार्यशाळेत गट विकास अधिकारी सुरेश तायडे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी तालुका स्तरावर ठोस पावले उचलून राहुरी तालुका जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल असे मत व्यक्त केले.
कार्यशाळांची प्रस्तावना स्नेहालय संस्थेचे संचालक हनिफ शेख यांनी केली. त्यांनी स्नेहालय आणि उडान प्रकल्पाचा प्रवास मांडत जागरूकता, प्रतिबंध आणि पुनर्वसन या तीन आधारस्तंभांवर आधारित कार्यपद्धतीची माहिती दिली. त्यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये “माझे गाव बालविवाहमुक्त गाव” ठराव पारित करण्याचे आवाहनही केले.
उडान प्रकल्पाच्या मानद संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र शासनाचा बालविवाह अधिनियम २०२२, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी नेमणूक, पालक सक्षमीकरण, पॉक्सो कायदा आणि ग्रामसभेत ठराव मंजूरीची प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. हीच माहिती राहुरी कार्यशाळेत उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी दिली.
बाल संरक्षण कक्षचे संस्था बाह्य काळजी अधिकारी सर्जेराव शिरसाठ यांनी ग्राम बाल संरक्षण समितीबाबत माहिती दिली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी बाल संरक्षण यंत्रणेची भूमिका स्पष्ट केली. केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी चाईल्ड हेल्पलाईन यंत्रणेची माहिती सादर केली. नगर तालुक्यात विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी स्थानिक अभियानाची प्रगती मांडली, तर राहुरी तालुक्यात बालविकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे यांनी पालक सक्षमीकरणाविषयी मार्गदर्शन केले.
कार्यशाळांमध्ये पर्यवेक्षक अधिकारी योगीराज जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण म्हेत्रे सर, संरक्षण अधिकारी संचिन जाधव, बाल संरक्षण कक्ष संस्था बाह्य काळजी अधिकारी सर्जेराव शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ता प्रकाश वाघ, सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षक, गट शिक्षण अधिकारी, आरोग्य अधिकारी, तालुका संरक्षण समिती सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळांचे सूत्रसंचालन उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन सीमा जुनी यांनी केले.कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मुक्ती वाहिनी प्रकल्प समन्वयक शाहिद शेख, पूजा दहातोंडे, प्रविण दरंदले, शुभम डहारे, निशा वाघ, विनायक महाले आणि पूजा डाकुआ यांनी परिश्रम घेतले.
या दोन्ही कार्यशाळांमध्ये बालविवाह निर्मूलनासाठी सर्व विभागांनी एकत्र येऊन १५ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या ग्रामसभेत “माझे गाव बालविवाहमुक्त गाव” ठराव मंजूर करण्याचा निर्धार व्यक्त केला. नगर आणि राहुरी तालुक्यांनी मिळून बालविवाहमुक्त जिल्ह्याच्या दिशेने ठोस आणि प्रेरणादायी पाऊल टाकले आहे.




