(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील जळगाव येथे मंगळवार (२४ जून) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिले असून बिबटयाने थेट मानवी वस्तीत प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहिती नुसार वाघवस्ती परिसरातुन आलेला बिबट्या संजय तुकाराम चौधरी यांच्या शेतातून विनायक चौधरी यांच्या घराजवळ दाखल झाला आणि तेथून पुढे घराजवळूनच एकनाथ सुखदेव चौधरी यांच्या वस्तीच्या दिशेने चालला असल्याचे निदर्शनास आले.बिबट्या थेट वस्तीच्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच शेजारील वस्तीवरील नागरिकांनी मोठी आरडाओरड सुरू केली.वस्तीवरील घाबरलेल्या नागरिकांनी मोठ्या आवाजात बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. या गोंधळानंतर बिबट्या पुढील शेतात धूम ठोकून पसार झाला.
घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्रीची वेळ असल्याने भीती अधिक तीव्र होती. या घटनेबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली असून वनविभागाची कार्यप्रणाली सुस्तीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
जळगावातील ग्रामस्थांनी बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.कोपरगाव वनविभाग प्रशासनाने वेळीच परिसरात पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करणे कामी पावले उचलली नाहीत, तर एखादी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.तरी वनविभागाने तात्काळ याठिकाणी पिंजरे लावावे अशी मागणी वस्तीवरील समस्त नागरिकांनी केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जळगाव परिसरात बिबट्याच्या हालचाली वाढल्या असून, शेतात पाळीव जनावरांवर हल्ल्याचे प्रकारही घडले आहेत. मात्र, प्रत्यक्ष मानवी वस्तीत बिबट्याचे दर्शन ही अधिकच गंभीर बाब असून वनविभागाने त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.
