महाराष्ट्रशेती

“Farming Innovation; गोंडेगावच्या शेतकऱ्याचा मेथी पिकातून आदर्श प्रयोग”

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

श्रीरामपूर – गोंडेगाव (ता. श्रीरामपूर) येथील प्रगतशील शेतकरी नारायणराव पिंजारी यांनी फक्त वीस गुंठे क्षेत्रात मेथीची यशस्वी लागवड करत उन्हाळ्यातही नफा कमावता येतो, हे आपल्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवले आहे.उन्हाळ्यात पाण्याचे सुयोग्य नियोजन आणि सेंद्रिय पद्धतींचा अवलंब करून त्यांनी तब्बल साठ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे.त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.या पिकात कोणत्याही रासायनिक खतांचा वापर झाला नाही संपूर्ण सेंद्रिय शेतीवर भर देण्यात आला. शेणखताचा मुबलक वापर केल्यामुळे मेथीची वाढ चांगली झाली.चितळी येथील मौनगिरी कृषी सेवा केंद्राचे संचालक शिवाजीराजे कदम यांच्या मार्गदर्शनामुळे मेथी भाजी लागवड अधिक प्रभावी ठरली.

एप्रिल महिन्याच्या कडाक्याच्या उन्हात तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या काळात बहुतांश शेतकरी भाजीपाला लागवडीपासून दूर राहतात. मात्र पिंजारी यांनी याच काळात मेथीच्या लागवडीचा प्रयोग केला. लागवडीपूर्वी नांगरणी करून रोटावेटरने ढेकळे फोडून मशागत केली जमीन भुसभुशीत केली दहा गुंठ्याच्या क्षेत्रात दोन टप्प्यांमध्ये मेथी बियाणे लागवड केली. पहिल्या टप्प्यात १० गुंठ्यात ३० किलो बियाण्यांची पेरणी करण्यात आली. शेततळ्यामुळे पाण्याची सोय उपलब्ध असल्याने पारंपरिक फ्लो पद्धतीने सिंचन देण्यात आले.यामुळे मेथी जोमात वाढू लागली.मेथी पिकाची वाढ पेरणीनंतर साधारणतः३० दिवसात पूर्ण होते, ज्यामध्ये सुरुवातीला बीज उगम होऊन लहान रोपे तयार होतात, नंतर या रोपांची हळूहळू उंची वाढत जाते, पाने गडद हिरवी व जाडसर होत जातात, रोपे एकसंध वाफ्यांमध्ये पसरतात, आणि शेवटी काढणीयोग्य कोमल, पोषक आणि विक्रीसाठी योग्य जुड्यांचे स्वरूप प्राप्त होते.

 

पेरणीनंतर पिंजारी यांच्या मेथी पिकाने अवघ्या ३० दिवसांत काढणीस यश मिळवले.पहिल्या टप्प्यातील दहा गुंठ्यांमधून सुमारे २ हजार नग मेथीच्या जुड्या मिळाल्या. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत २ हजार रुपये शेकडा भाव मिळाला. पहिल्याच १० गुंठे क्षेत्रातून ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यातून १० हजार खर्च वजा जावून ३० हजार नफा शिल्लक राहिला. सध्या त्यांनी दुसऱ्या टप्प्यात दहा गुंठ्यांत मेथी काढण्यासाठी सुरुवात केली असून सुमारे अठराशे ते दोन हजार जुड्यांचे उत्पादन अपेक्षित आहे. श्रीरामपूर बाजार समितीत मेथीला दोन हजार रुपये शेकडा दर मिळत आहे. मेथीला व्यापारी वर्गाकडून चांगली मागणी वाढली आहे.

 

एकूण वीस गुंठ्याच्या लागवडीसाठी बियाणे,मजूरी, वाहतूक, औषधे, खते, हमाली आणि आडत यासह जवळपास २० हजार रुपये खर्च आला. एकत्रित उत्पन्न ७० ते ८० हजार रुपये मिळाले.यातून २० हजार खर्च बाजूला ठेवला तर शेतकऱ्यांना ३० दिवसांच्या कालावधीतच तब्बल ६० हजार रुपयांचा निव्वळ नफा शिल्लक राहिला आहे.उन्हाळ्यात शेतीतून आर्थिक लाभ मिळवता येतो, हे नारायणराव पिंजारी यांच्या प्रयोगातून स्पष्ट केले आहे. सेंद्रिय शेतीच्या दिशेने त्यांनी टाकलेली कात इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!