
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – चितळी (ता. राहाता) येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी मधुकर आग्रे यांना महाराष्ट्र ग्रामविकास व जलसंधारण विभाग आणि नालंदा ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित ‘ग्रामविकास महोत्सव २०२५’ मध्ये ‘आदर्श ग्रामविकास अधिकारी’ या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.राज्यभरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये आग्रे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले गेले असून, त्यांच्या कार्यक्षमतेची सर्वत्र स्तुती होत आहे.
विशेष म्हणजे,आग्रे यांना हा पुरस्कार त्यांची सेवा कणकुरी (ता. राहाता) येथे असताना जाहीर झाला होता, आणि सध्या ते चितळी येथे कार्यरत आहेत.मधुकर आग्रे यांच्याकडे पुणतांबा ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभारही आहे.गावातील ग्रामस्थ, सहकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी या गौरवाचे मनःपूर्वक स्वागत करत आग्रे यांचे अभिनंदन केले आहे.
पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल चितळी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सन्मान समारंभाचे आयोजन करून मधुकर आग्रे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.दोन्ही गावांमध्ये त्यांनी ऊर्जाबचत, स्वच्छता मोहिम, महिला सक्षमीकरण, अंगणवाडी सुधारणा, डिजिटल ग्रामपंचायत आणि सामाजिक जनजागृती यांसारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले आहेत.या सन्मान सोहळ्यावेळी चितळीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच नारायणराव कदम, उपसरपंच कविताताई पगारे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वाणी, प्रकाश आरणे, संजय वाघ, ताराबाई गायकवाड, विद्या शिंदे, स्वाती वाघसुवर्णा माळी, संपत विनायक वाघ, संपत सूर्यभान वाघ, बाळासाहेब माळी, ग्रामपंचायत ऑपरेटर कैलास साळुंखे, कर्मचारी संतोष वाघ,उपस्थित होत्या.
“गावाच्या विकासासाठी माझं कार्य हे केवळ माझं नसून, ग्रामस्थ आणि पंचायत यंत्रणेच्या एकत्रित प्रयत्नांचं फलित आहे. शासनाच्या योजना प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरवताना आनंद आणि समाधान मिळतं. प्रत्येक उपक्रमात नागरिकांचा सहभाग, विश्वास आणि सहकार्य हेच माझं खरे बळ आहे. हा सन्मान मला अधिक जबाबदारीची जाणीव करून देतो आणि भविष्यातही समर्पितपणे काम करण्याची प्रेरणा मिळते.”— मधुकर आग्रे, ग्रामविकास अधिकारी
“ग्रामविकास अधिकारी मधुकर आग्रे यांनी चितळीच्या ग्रामविकासाला नवी दिशा दिली आहे. योजना अंमलबजावणीत पारदर्शकता आणि लोकसहभागाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. त्यांचा सन्मान संपूर्ण गावासाठी गौरवाची बाब आहे.”– नारायणराव कदम, प्रथम लोकनियुक्त सरपंच, चितळी
