
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर –पावसाळ्याने यंदा थोडी घाईच केली. उघड्याशा आकाशातून गार वाऱ्यांसह आलेल्या सरींनी शेतकऱ्यांचं स्वागत तर केलंच, पण गावोगावी लग्नसराईला पण नवसंजीवनी दिली. 23 मेचा तो दिवस… रिमझिम पावसात भिजलेलं गाव, आणि एका घरात लग्नाची लगबग सुरू होती यावेळी एका जबाबदार नागरिकांने उडान टिमला सूचित करून हा बालविवाह रोखला.
बाहेर वऱ्हाड सजत होतं, घरात वऱ्हाडी गोडधोड चाखत होते, आणि मंडपात सुरू होती सजावट. पण या चमचमती सजावटीच्या आड एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत होता. तिने शिक्षणाच्या वर्गातून संसाराच्या चुलीपाशी जाण्याची तयारी केली नव्हती. पण तिचं बालपण तिच्या नकळतच संपवलं जात होतं.गावातील एका जागरूक नागरिकाने उडान प्रकल्पाच्या हेल्पलाइनवर (9011026495) फोन करून ही माहिती दिली. त्याच्या त्या एका कॉलने मुलीच्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकला.
माहिती मिळताच, स्नेहालय उडान प्रकल्पाची टीम सतर्क झाली. तीने तातडीने त्या घरातील स्थितीची शहानिशा केली. मुलीच्या वयाचे दस्तावेज तपासले. वय अवघं 16 वर्ष असल्याचे स्पष्ट झाले. माहिती पोलिस हेल्पलाइन 112, चाईल्ड हेल्पलाइन 1098, ग्रामसेवक आणि बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली.सुरुवातीला घरच्यांनी “साखरपुडा आहे” अशी बतावणी केली. पण भिंगार पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि उडान टीमने संयमाने चौकशी केली. सखोल विचारपूस केल्यानंतर घरच्यांनी अखेर कबुल केलं होय, ही मुलगी लग्नासाठी सजत होती.
यावेळी मुलगी आणि तिचे पालक बालकल्याण समिती (CWC) समोर हजर करण्यात आले. तिथे समुपदेशन करून पालकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देण्यात आली. त्यांच्याकडून लेखी हमी घेण्यात आली की मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह लावला जाणार नाही.मुलीला शैक्षणिक आणि मानसिक आधार देण्यात आला. स्थानिक ग्राम बाल संरक्षण समिती आणि बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांना संबंधित कुटुंबावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं.
दोन महिन्यात 11 बालविवाह रोखले – उडानची उल्लेखनीय कामगिरी
- केवळ या प्रकरणातच नाही, तर एप्रिल ते मे 2025 या कालावधीत उडान प्रकल्पाने एकूण 11 बालविवाह रोखले आहेत. हे शक्य झाले जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महिला व बालविकास विभाग, पोलीस प्रशासन, चाईल्ड हेल्पलाइन, बालकल्याण समित्या आणि स्थानिक यंत्रणा यांच्या सततच्या समन्वयामुळे.
