
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील पुणतांबा ते वाकडी मार्गावरील रामपूरवाडी गावाजवळील पूलावर पावसाळ्याच्या सुरुवातीस मोठे खड्डे पडल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे वाहनांची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता असताना अपघातांचा धोका वाढला आहे. पुलाची जीर्ण अवस्था लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत असल्याने नागरिक आणि प्रवासी मोठ्या चिंता व्यक्त करत असून जीर्ण अवस्थेतील पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
‘अहिल्यानगर खबरबात’ने या पूलाच्या दयनीय अवस्थेची बातमी प्रकाशित केली. त्यानंतर लगेचच सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रवींद्र चौधरी यांनी पूलाची पाहणी करण्यासाठी रामपूरवाडी येथे भेट दिली. पावसाळी परिस्थिती असूनही त्यांनी तातडीने स्थानिकांचे त्रास समजून घेऊन आवश्यक तो नजरेस पडण्याचा प्रयत्न केला. रामपूरवाडीचे सरपंच संदीप सुरडकर यांनीही अधिकारी यांच्यासोबत जाऊन पूलाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी गावकऱ्यांना आणि प्रवाशांना दररोज होणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांसमोर स्पष्टच मांडल्या यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रवींद्र चौधरी यांनी सदर प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या पाहणीवेळी कार्यध्यक्ष बबनराव काळे, तसेच ग्रामस्थ प्रकाश शेळके, लहानु वडणे, गजानन रणछोड, चांगदेव जगताप यांनीही उपस्थित राहून पूलाच्या समस्येबाबत माहिती दिली. सरपंच सुरडकर म्हणाले की, हा पूल जवळपास ३३ वर्षांपूर्वी बांधण्यात आला असून आज त्याची अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे. पुलावर होणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला मोठा धोका आहे. स्थानिक आणि प्रवासी यांना सतत अपघात घडण्याची भीती वाटत असल्याने त्वरित दुरुस्ती आवश्यक आहे.
शाखा अभियंता रवींद्र चौधरी यांनी सांगितले की, पावसाळी हंगाम सुरू असल्यामुळे अहवाल तयार करण्यात विलंब झाला आहे. तरीही त्यांनी आश्वासन दिले की,आठ दिवसांच्या आत पुलावर तात्पुरती दुरुस्ती करून जेवढ्या रुंदीच्या नळ्या आहेत त्या भागात काँक्रेट करून वाहतूक सुरळीत केली जाईल. सध्या पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने ही तात्पुरती उपाययोजना अत्यंत आवश्यक आहे.मात्र,जर सार्वजनिक बांधकाम विभागा कोपरगाव यांनी पुलाची पहाणी करून पण या समस्येवर आगामी आठ दिवसात दुरुस्ती करून तोडगा न काढल्यास येत्या काळात कोपरगाव PWD कार्यालयासमोर ग्रामस्थांसह ‘भीक मागो’ आंदोलन छेडणार असल्याचे सरपंच सुरडकर यांनी सांगितले आहे.
