
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आनंद भंडारी यांनी घेतलेल्या तत्पर निर्णयामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ‘उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान’ राबविण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. स्नेहालय संस्थेच्या ‘उडान प्रकल्पा’मार्फत मागील पाच वर्षांपासून ग्रामीण भागात बालविवाह रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना आता जिल्हा प्रशासनाचे अधिकृत पाठबळ मिळाल्याने, ही मोहीम अधिक व्यापक आणि परिणामकारक होणार आहे.
काल स्नेहालयचे संचालक हनीफ शेख, उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम, तसेच कार्यकर्त्या सीमा जुनी आणि निलोफर शेख यांनी मा. आनंद भंडारी यांची भेट घेऊन, ‘बालविवाहमुक्त जिल्हा’ करण्याच्या संकल्पावर आधारित एक सविस्तर कृती आराखडा सादर केला. या बैठकीत भारत सरकारचे ‘बालविवाहमुक्त भारत’ अभियान, तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेले मार्गदर्शक निर्देशही उघडपणे मांडण्यात आले.
स्नेहालयच्या उडान प्रकल्पाने आतापर्यंत अनेक गावांमध्ये बालविवाह रोखण्यात यश मिळवले असून, शेकडो मुलींना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य केले आहे. हे अभियान केवळ प्रतिबंधापुरते मर्यादित न राहता, जनजागृती, कायदेशीर कारवाई, ग्रामपंचायत ठराव, बालविवाह प्रतिबंधक समित्यांची स्थापना, आणि स्थानिक यंत्रणांशी समन्वय अशा अनेक टप्प्यांतून प्रभावी अंमलबजावणी साधत आहे. ही माहिती ऐकून मा. आनंद भंडारी यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद दिला.
या भेटीनंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले की, ‘उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान’ जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रभावीपणे राबवण्यात यावे. तसेच ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी, पोलीस, सामाजिक संस्था आणि युवक संघटनांना यामध्ये सहभागी करून घेत, समन्वयाची मजबूत रचना उभारावी. ही मोहीम आता जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संस्थेच्या संयुक्त भागीदारीत राबवण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील बालविवाहास आळा बसणारच आहे, शिवाय मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना मिळेल, त्यांच्यात स्वावलंबन निर्माण होईल, आणि संपूर्ण समाजात लिंग-समानतेच्या विचारांची रुजवणूक होईल. १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प करत, या अभियानाला एक सामाजिक चळवळ स्वरूप प्राप्त होत आहे.
या महत्त्वपूर्ण पुढाकाराबद्दल बोलताना मा. आनंद भंडारी म्हणाले, “सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन आणि समाज संस्थांनी एकत्र काम करणे ही काळाची गरज आहे. ‘उडान प्रकल्प’ एक आदर्श पायाभरणी करत आहे आणि आम्ही त्याला पूर्ण पाठबळ देणार आहोत.”अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त होण्यासाठी उडानचा उड्डाण आता अधिक वेगवान आणि व्यापक होणार आहे. स्नेहालयच्या अनुभवसंपन्न कार्यसंघासह जिल्हा प्रशासनाची बांधिलकी मिळाल्याने, हे अभियान राज्यात आणि देशात एक प्रेरणास्त्रोत ठरणार आहे.
