
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
प्रतिनिधी-अक्षय काळे
कोपरगाव – कोपरगाव नगरपरिषद संचलित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा अंतर्गत तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वाचन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेत लेखक व कवी कैलास साळगट व राज्यपुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका, कवयित्री सुनिता इंगळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांनी अध्यक्षीय मनोगतात ग्रंथालयाने राबवीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली. माणसापेक्षा पुस्तकांना आपला मित्र बनवा, ते तुम्हाला कधीही फसवणार नाहीत, तुम्हाला कधीही निराश करणार नाही. उलट नेहमी जीवनात तुमची साथ देतील, तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकवतील आणि समाजाचा खरा आरसा दाखवतील. असे प्रतिपादन केले. उपस्थित मान्यवरांना ग्रंथभेट देवून यथोचित सत्कार करण्यात आला. लेखक व कवी कैलास साळगट मनोगतात म्हणाले, निरंतर व सतत वाचण्याची सवय लागावी यासाठी कोणती पुस्तके वाचावीत, कशी वाचावी, वाचन कौशल्य विषयी मूलभूत संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनावर भर दिला पाहिजे. दिवाळी अंकात लेख लिहिणे, नियतकालिकांमधून लिहिणं, कविता करणे साहित्य निर्मिती करणे असे विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. त्याचप्रमाणे संदर्भपुस्तके मोठ्या प्रमाणात वापरली तर मुलांच्या वाचनाच्या कक्षा रुंदावतील.
यावेळी कवयित्री सुनिता इंगळे यांनी समाजाच्या बौद्धिक व सामाजिक विकासासाठी ग्रंथ आणि ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मोबाईल, इंटरनेट या माध्यमांमुळे वाचनावर परिणाम होता कामा नये. लहान वयामध्येच मुलांना वाचनाची गोडी लागण्यासाठी शालेय शिक्षणातील घटक आणि पालक यांची भूमिका महत्त्वाची आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजेंद्र शेलार यांनी केले. यावेळी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, ग्रंथालयाचे वाचक व समता अभ्यासिकेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते.
