
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगांव -मागील दोन-तीन दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. ऐन उन्हाळ्यात पावसाळा जाणवायला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने यंदा मान्सूनचे लवकर आगमन होणार आहे असे सूतोवाच केले आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे, कृषी दुकाने बी बियाणे, कीटकनाशकाने सजू लागली आहेत., विविध कंपन्यांचे बी बियाणे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. गोदावरी डावा आणि उजव्या कालवा लाभक्षेत्रात शनिवारी ३९ मिलीमिटर पाउस पडल्याची नोंद आहे. दारणा, गंगापुर, मुकणे वालदेवी धरणांतुन ११ हजार ४९७ क्युसेक्स पाणी गोदावरी नदीस सोडण्यांत आले आहे. , तर गोदावरी उजव्या कालव्याला ११,७६३, डाव्या कालव्याला ५०५६ तर नांदूर मधमेश्वर जलद कालव्याला१०,५३६ असे एकूण २७ हजार ३५५ क्युसेक्स पाणी उन्हाळी आवर्तनासाठी सोडण्यात आले आहे. शनिवारी पडलेला पाउस मिलीमिटरमध्ये पुढील प्रमाणे.सोमठाणे १, कोळगांव (४), सोनेवाडी (३), शिर्डी (१३), राहाता (८), रांजणगांव खुर्द (५), चितळी (५), मिलिमीटर याप्रमाणे पाउस झाला.
बेमोसमी पावसामुळे ग्रामीण भागात विजेच्या तारांसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याच्या दुरुस्तीचे काम अद्यापही सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहे. अनेक वीजरोहित्रे नादुरुस्त झालेले आहेत, शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे देऊन त्याची दुरुस्ती करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे हात पसरावे लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेले आहे ते न काढल्यामुळे त्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.
काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेततळ्यांसाठी वापरला जाणारा प्लास्टिकचा कागद उडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतक-यांनी आगामी खरीप हंगामासाठी तयारी सुरू केली आहे.दारणेतुन १७ हजार ५५१, गंगापुर ११ हजार ४३५, मुकणे ६ हजार ५०५ व वालदेवी धरणातुन ३ हजार ३६१ क्युसेक्स पाणी गोदावरी कालव्यासह नदीस सोडण्यांत आले आहे. धरणे खपाटीला आहेत.
