
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी अहिल्यानगरमधील सुप्रसिद्ध बेलेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. या यात्रेच्या निमित्ताने स्नेहालय उडान प्रकल्पाच्या वतीने २६ फेब्रुवारी २०२५ रोजी बालविवाहविरोधी जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले.
मंदिर परिसरात आलेल्या भाविकांमध्ये महिलांसह लहान मुले, युवक-युवती आणि वयस्कर नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. ही संधी साधत उडान प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देणारी पत्रके वाटली आणि नागरिकांना जागरूक केले.बालविवाह म्हणजे काय याबाबत उडान टीमने माहिती देताना सांगितले की,१८ वर्षांखालील मुली आणि २१ वर्षांखालील मुलांचे विवाह कायद्याने गुन्हा आहेत. अशा विवाहांना उपस्थित राहणेही गुन्हा मानले जाते. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागून बालविवाह रोखण्यासाठी जागरूक राहावे, असे आवाहन करण्यात आले.
यात्रेतील व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग घेतला यावेळी मंदिर परिसरात आणि यात्रेत विविध ठिकाणी फलक, पोस्टर्स आणि सूचना पत्रके लावण्यात आली. त्याचबरोबर, यात्रेत सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातूनही हा संदेश पोहोचवण्यात आला. या उपक्रमाला भाविक आणि व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
- स्नेहालय उडान प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात आणि यात्रेत आलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यांनी बालविवाहाचे गंभीर परिणाम, कायदेशीर तरतुदी आणि समाजावर होणारे दुष्परिणाम याबद्दल सखोल माहिती दिली.भाविकांना आवाहन करण्यात आले की, “जर कुठेही बालविवाह होत असेल किंवा झाल्याची माहिती मिळाली, तर तातडीने उडान हेल्पलाइन: 9011026495 चाइल्ड हेल्पलाइन: 1098 क्रमांकावर माहिती द्यावी.
- स्नेहालय उडान प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान..
- या उपक्रमासाठी स्नेहालय उडान प्रकल्पाच्या मानद संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर आणि संचालक हनिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम, सामाजिक कार्यकर्ते शाहिद शेख, पूजा दहातोंडे, शशिकांत शिंदे तसेच उडानचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
