महाराष्ट्र

राहाता तालुक्यात फळबागांचे मोठे नुकसान; प्रभावती घोगरे मैदानात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागांचे अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रभावती घोगरे यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

 

गोगलगाव येथील रहिवासी शेतकरी विनायक चौधरी यांच्या संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथील शेतातील फळबागेला या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर मोठ्या प्रमाणावर कच्ची फळे गळून पडली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

 

पाहणीदरम्यान प्रभावती घोगरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानाचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश देत शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याची मागणी केली.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने विलंब न करता तातडीने मदत जाहीर करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी,” असे त्या म्हणाल्या.

तसेच, भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, पीक विमा योजनांचा लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.या पाहणीवेळी विलास गुळवे, शेतकरी विनायक चौधरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील इतर शेतकऱ्यांनीही आपल्या नुकसानीबाबत माहिती देत शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!