
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगाव – योगामुळे शरीर लवचिक व मजबूत तर बनतेच पण त्याबरोबर मन शांत आणि एकाग्र राहते. चिंता, तणाव, राग यावर नियंत्रण मिळविता येते. मनाच्या एकाग्रतेमुळे विद्यार्थ्यानाही अभ्यासात फायदा होतो. योगामध्ये आसने, प्राणायाम, ध्यान, शुद्धीक्रिया आणि नैतिक मुल्ये यांचा समावेश असतो. योग हा ध्यान साधनेकडे घेऊन जाणारा मार्ग असून ध्यानातून आत्म्याची ओळख होते. योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचे संतुलन आहे, असे प्रतिपादन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे यांनी केले.
ते आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल येथे आयोजित “जागतिक योगदिन” कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी योग प्रशिक्षक अनिकेत सुसरे यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षक कर्मचारी यांना योगाचे महत्व समजावून सांगितले. तसेच त्यांनी योगाचे प्रात्याक्षिके करून दाखवून उपस्थितांकडून योग, प्राणायाम व ध्यान करून घेतले. संकुलाच्या विद्यार्थीनींनी संगीत योगा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या योगदिन कार्यक्रम प्रसंगी आश्रमाचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, विश्वस्त प्रकाश गिरमे, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, श्रीमती पटेल मॅडम, प्राचार्य निरंजन डांगे, माणिक जाधव, संदीप गायकवाड, नामदेव डांगे, नितीन सोनवणे, दिनकर राऊत, अशोक शिंदे, दीपक आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
