
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – राहाता तालुक्यातील पुणतांबा–रामपूरवाडी–वाकडी रस्त्यावरील पुलावरील जीवघेणं भगदाड कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परतेने सिमेंट काँक्रेटीकरण करून बुजवल्याची माहिती रामपूरवाडीचे सरपंच संदीप सुरडकर यांनी दिली.
राहाता तालुक्यातील पुणतांबा–रामपूरवाडी–वाकडी मार्गावरील मुख्य गावांना जोडणाऱ्या पुलाची उभारणी तब्बल २९ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र गेल्या काही काळात या पुलावर मोठ्या खड्ड्यांची निर्मिती झाल्यामुळे नागरिकांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत होते. रामपूरवाडी–वाकडी तसेच परिसरातील विविध गावाला जोडणारा हा एकमेव मार्ग असून, पुलाच्या मध्यभागी पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालक खुप हैराण झाले होते त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
पुलाची उंची रस्त्याच्या तुलनेत खोलगट असल्याने दरवर्षी पावसाळ्यात त्या खड्ड्यांत पाणी साचायचे, त्यामुळे पुलाची झीज अधिक वेगाने होत गेली.पाण्याखाली खड्डे लपल्यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नसे आणि त्यामुळे अनेक अपघात घडले होते.
जवळपास २९ वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाची कोणतीही देखभाल किंवा दुरुस्ती करण्यात आली नव्हती. यामुळे सरपंच संदीप सुरडकर यांनी “पुलाचे तात्काळ काम हवे, अन्यथा भीक मागो आंदोलन उभारून पुलाचे काम आम्हीच करणार!” असा थेट इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला होता.
या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत “अहिल्यानगर खबरबात” ने २५ मे रोजी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत ठळक बातमी प्रसिद्ध केली.त्यानंतर कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रवींद्र चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पुलाची पाहणी केली व खड्डे त्वरित बुजविण्याचे आश्वासन दिले.
या आश्वासनानंतर २४ जून रोजी कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रामपूरवाडी रस्त्यावरील पुलावर पडलेले खड्डे सिमेंट काँक्रेटीकरणाच्या माध्यमातून बुजवले. त्यामुळे आता हा पुल पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षित वापरासाठी खुला करण्यात आला आहे.रामपूरवाडी पुलाच्या संदर्भातील या प्रश्नाची कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतल्याबद्दल समस्त ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
