
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – जागतिक बालकामगार दिनानिमित्त, स्नेहालयच्या बालकामगार विभाग, मुक्त वाहिनी, उडान प्रकल्प व बालभवन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्दिष्ट बालकामगार निर्मूलन व बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक समस्यांबाबत जनजागृती करणे हे होते.
चितळे रोड येथून सुरू झालेली ही पदयात्रा परिसरातून घोषणांसह निघाली. “काम नको शिक्षण हवे”, “बालपण वाचवा – शिक्षण घडवा”, “बालमजुरी बंद करा – शिक्षण सुरू करा” अशा जोरदार घोषणा देत मुलींनी आणि सहभागी स्वयंसेवकांनी परिसरात जनजागृती केली. अनेक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, बालभवन प्रकल्पाचे विद्यार्थी व स्थानिक नागरिकांनी पदयात्रेत सहभाग घेतला.
या कार्यक्रमात बालविवाहातून मुक्त करण्यात आलेल्या मुलींना अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले. या मुलींच्या संघर्षपूर्ण प्रवासाची दखल घेत त्यांचे पुनर्वसन व सशक्तीकरणासाठी स्नेहालय उडान प्रकल्पातर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. यावेळी ६० मुलींना कीट देण्यात आले.
तसेच याच कार्यक्रमात १० वी आणि १२ वी मध्ये यश संपादन केलेल्या एकूण १० विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. या मुलींनी कठीण परिस्थितीतही शिकून यश मिळवल्यामुळे त्यांचा सन्मान करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तोपखाना पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम श्रीवास्तव उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, “बालकामगार रोखणे ही सामाजिक बांधिलकी आहे. पोलिस यंत्रणा या चळवळीत सर्वतोपरी सहकार्य करेल.” त्यांनी स्नेहालयच्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत स्नेहालयचे संचालक हनीफ शेख यांनी स्नेहालयच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, स्नेहालय गेल्या ३५ वर्षांपासून वेश्याव्यवसायमुक्ती, बालकांचे संरक्षण, HIV ग्रस्त कुटुंबीयांचे पुनर्वसन, महिला सशक्तीकरण अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. उडान, मुक्ती वाहिनी, बालभवन, स्नेहांकुर हे प्रकल्प बालकांच्या हक्कासाठी झटत आहेत.
कार्यक्रमात कामगार विभागाचे आयुक्त रेवननाथ भीसाळे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना शुभेच्छा देत सांगितले की, शासनाच्या विविध योजना या मुलींना त्यांच्या प्रगतीसाठी मदत करतील.
या कार्यक्रमात ग.ज. चितांबर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विभावरी रोकडे यांनी शुभेच्छा दिल्या. स्नेहालयच्या कार्याने प्रभावित होऊन निवृत्तीनंतर स्वयंसेवक म्हणून काम करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.बालकल्याण समितीच्या सदस्य अॅड. अनुराधा येवले यांच्या हस्ते अन्नधान्य वितरण करण्यात आले. त्यांनी मुलींना शिक्षण आणि स्वावलंबनाच्या वाटचालीत सातत्य ठेवण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्ती वाहिनी प्रकल्पाच्या सामाजिक कार्यकर्त्या सीमा जुनी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार स्नेहालय उडान प्रकल्पाच्या संचालक अॅड. बागेश्री जरंडीकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी शेवटी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा प्रवीण कदम यांनी दिली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम, समन्वयक शाहिद शेख, पूजा दहातोंडे, शशिकांत शिंदे, पूजा डाकुआ, प्रवीण दरंदले, शुभम डहारेयांच्यासह संपूर्ण उडान व मुक्त वाहिनी प्रकल्पाचे कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.
