
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – राहता तालुक्यातील एका गावात अवघ्या १६ वर्षीय मुलीच्या बालविवाहाचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती फेब्रुवारी १६ फेब्रुवारी रोजी स्नेहालय उडान टिमच्या हेल्पलाइनला मिळाली आणि त्यानंतर अवघ्या काही तासांत हा विवाह रोखण्यात आला.हा विवाह संगमनेर तालुक्यातील २६ वर्षीय युवकासोबत होणार होता.
गेल्या सहा महिन्यांपासून एका तरुणाने मुलीला वारंवार छळले, शाळेच्या परिसरात त्रास दिला आणि जबरदस्तीने लग्नासाठी दबाव टाकला. या संदर्भात कुटुंबाने पोलिसांकडे अनेकदा तक्रारी दिल्या, मात्र ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे मुलीच्या सुरक्षिततेसाठी आई-वडिलांनी तिला विवाहबद्ध करण्याचा निर्णय घेतला.स्नेहालयच्या उडान हेल्पलाइनवर मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी तातडीने पुढील कृती केली ग्रामसेवक व बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले.
यानंतर ग्रामसेवक स्वतः बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आणि स्थानिक ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य मुलीच्या घरी पोहोचल्यावर कुलूप आढळले, मात्र चौकशीत समजले की विवाह संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे होणार आहे.उडान टीमला ही माहिती दिल्यानंतर ताबडतोब उडान चे प्रकल्प व्यवस्थापक यांनी संगमनेर तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई करण्यास सांगण्यात आले.तत्काळ ग्रामसेवकांनी विवाहस्थळी जाऊन नोटिसा बजावल्या आणि विवाह रोखण्यात आला.संबंधित मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी ठोस पावले उचलले जाणार असून मुलीच्या परीक्षेनंतर तिला आणि तिच्या कुटुंबाला बालकल्याण समितीसमोर सादर करून आवश्यक मदत आणि संरक्षण पुरवले जाणार आहे.
मुलगी हुशार असून तिचे शिक्षण सुरू ठेवण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, सततच्या मानसिक त्रासामुळे ती गोंधळात पडली होती. उडान टीमने तिचे समुपदेशन करून तिला मानसिक आधार दिला आणि तिच्या दहावीच्या परीक्षांसाठी तयारी करण्यात मदत केली.बालविवाह हा केवळ बेकायदेशीर नसून तो मुलीच्या आरोग्यास, शिक्षणास आणि उज्ज्वल भविष्यास घातक ठरतो. जर कोणत्याही अल्पवयीन मुलीचा विवाह होत असेल किंवा होणार असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित खालील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा स्नेहालय उडान हेल्पलाइन –9011026495 चाइल्ड हेल्पलाइन – 1098 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन चाइल्ड लाईन हेल्पलाइन कडून करण्यात आले आहे.
