
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगाव – कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नाफेड व एनसीसीएफ मार्फत कांदा खरेदी तात्काळ सुरू करावी, अशी मागणी आमदार विवेक भैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,कोपरगाव तालुक्यासह महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन घेतात. मात्र सध्या कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शेतीच्या उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असताना कांद्याला मिळणारा कमी दर हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांना आपला कांदा उत्पादन खर्चापेक्षाही कमी दराने विकावा लागत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
सदर परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव तसेच राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नाफेड व भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) मार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तात्काळ सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या खरेदीमुळे बाजारभाव स्थिर राहण्यास मदत होईल तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या कांदा उत्पादनाला योग्य व हमीभाव मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगावसह राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये नाफेड व भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) मार्फत कांदा खरेदी लवकरात लवकर सुरू करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश द्यावेत,अशी मागणी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.




