
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यात हुमणीअळीच्या प्रादुर्भावामुळे पिकांवर दुष्परिणाम झाला असून वाकडी,एलमवाडी,रामपूरवाडी गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांवर खुप मोठे संकट कोसळले आहे हुमणीअळीने सोयाबीनचे पीक फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांनी हताश होवून थेट रोटाव्हेटरद्वारे पीक भुईसपाट केले.

राहाता तालुक्यातील वाकडी शिवारातील शेतकरी भाऊसाहेब पानसरे यांचे गटनंबर ५५९ मध्ये १ एकर तर मंदाबाई जाधव यांचे गटनंबर ४५५ मध्ये अडीच एकर हंगामी कोरडवाहू क्षेत्र असून ते अल्पभूधारक शेतकरी आहे.त्यांनी भाडोत्री ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत केली उसनवारी पैसे घेऊन बी-बियाणे खरेदी करून जुन महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस पाऊस सुरू होता यावर भरवसा ठेवून त्यांनी शेतात सोयाबीनची पेरणी केली होती.अंदाजे ४५ हजार रुपये खर्च झाला.सोयाबीन पिकातून चांगले उत्पन्न मिळेल त्यांना अपेक्षा होती.परंतु निसर्गाचा खेळ काही वेगळाच होता.
मात्र तेच सोयाबीनचे पीक रोटाव्हेटरद्वारे डोळ्या देखत नष्ट करण्याची वेळ आली असून दुबार पेरणीचे संकटही कोसळले आहे.मध्यंतरी पावसाने तब्बल १५ ते २० दिवसापासून ओढ दिलेली असून पिकांना पोषण न मिळाल्याने सोयाबीन मका हंगामी पिकांनी माना टाकायला सुरवात केली असून हातातोंडाशी येणारा घास हिरावल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.पूर्वीचे पीक उभे करण्यासाठी जमापुंजी खर्च झाली असून पुढील पीक उभे राहील की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे आधीच राज्यातील शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असून हे नुकसान शेतकऱ्यांना न झेपवणारे आहे.निसर्गाचा लहरीपणा वेळोवेळी पडणाऱ्या किडी रोगाचा प्रादुर्भाव यावर मात करून जरीही पीक जगवले तरी शासनाकडून शेतमालाला हमीभाव मिळत नाही त्यामुळे शेती व्यवसाय आर्थिक तोट्याचा ठरत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
या प्रादुर्भावाला बळी पडलेल्या शेतकऱ्यांनी कंटाळून सोयाबीनच्या उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवत आपला रोष व्यक्त केला असून ऊस, मका पिकावर हुमणीअळीचा वाढता प्रभाव दिसून येतो त्यामुळे शेतकरी विवंचनेत सापडले आहे राज्य शासन कृषी विभागाने हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सत्रांचे आयोजन करून हुमणी नियंत्रणासाठी एकात्मिक मोहिम हाती घेवून राहाता तालुका कृषी अधिकारी यांनी पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके शेतकरी सागर जाधव, भाऊसाहेब पानसरे, मंदाबाई जाधव, यांनी केली आहे.
अडीच एकर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी केली होती पावसाने ओढ दिली.यावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढला अळ्यानी मुळे कुरतडून पिकाचा नाश केला मध्येच पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी.
– मंदाबाई जाधव, महिला शेतकरी वाकडी




