
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगाव – अहिल्यानगर जिल्ह्यात स्नेहालय संचालित उडान प्रकल्पाच्या माध्यमातून जनजागृतीचे काम प्रभावीपणे चालू असून.या कार्यात संपूर्ण जिल्हा परिषदेचे प्रशासन खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करत आहे.अहिल्यानगर जिल्हा २०२७ पर्यंत बालविवाह मुक्त करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ग्रामपातळीवर बाल संरक्षण समित्या स्थापन करून त्या सक्रिय कराव्यात कोपरगाव तालुक्यात माझे गावं बालविवाह मुक्त गाव हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृती करावी असे आवाहन कोपरगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या सूचनेनुसार,अहिल्यानगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्याच्या उडान अभियानांतर्गत कोपरगाव पंचायत समितीच्या सभागृहात बालविवाह प्रतिबंध व बालहक्क संरक्षण विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.ही कार्यशाळा स्नेहालयाचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी, मानद संचालक ऍड.बागेश्री जरंडीकर, संचालक हनीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकारी संजय कदम आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सर्जेराव शिरसाठ यांचे विशेष सहकार्य लाभले.

ते म्हणाले,शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या आदेशान्वये ग्रामपंचायतस्तरावर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे शासनाच्या आदेशाप्रमाणे अकरा सदस्य असणाऱ्या ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून कायदेशीर अंमलबजावणी करावी.ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृती व्हावी हाच शासनाचा प्रमुख उद्देश असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या ग्रामसभेत माझे गाव बालविवाह मुक्त गाव माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा, बालविवाह प्रतिबंध,ग्राम बाल संरक्षण समिती स्थापना करून कार्यन्वित करणे आदी विषयावर भर द्यावी.असे ते बोलताना म्हणाले.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉ.अशोक गावीत्रे यांनी बालविवाह प्रतिबंधासाठी समुदाय सहभागाचे महत्त्व आपल्या अनुभवांमधून स्पष्ट केले. त्यांनी गावकुसातील नागरिकांनी एकत्र येऊन बालविवाहाविरुद्ध लढा देण्याची गरज अधोरेखित केली.गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी ग्रामपातळीवर बाल संरक्षण समित्या प्रभावीपणे स्थापन करून त्याद्वारे बालविवाह रोखण्याचे आवाहन केले.गट शिक्षण अधिकारी शबाना शेख यांनी शाळा स्तरावर जनजागृती वाढवण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागाने सक्रीय सहभाग घेण्याची गरज अधोरेखित केली.सहायक गट विकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि ग्रामसेवक यांनी गावोगाव जनजागृती मोहीम राबवण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006, बाल कामगार प्रतिबंधक अधिनियम 1986, हुंडा प्रतिबंधक कायदा, बाल संरक्षण कायदा 2015, किशोर न्याय कायदा 2015 आणि पोस्को कायदा 2012 यांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी या कायद्यांद्वारे गावपातळीवर प्रभावी कारवाई करून बालहक्क रक्षणाची गरज अधोरेखित केली.
चाईल्डलाइन समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी बाल संरक्षणाशी संबंधित विविध शासकीय यंत्रणा आणि त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्या. बाल संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग,स्नेहालय उडान प्रकल्प आणि पंचायत समिती यांच्यातील समन्वय साधून गावपातळीवर बालविवाह प्रतिबंधाचे प्रयत्न अधिक प्रभावीपणे कसे राबवता येतील हे त्यांनी स्पष्ट केले.या कार्यशाळेत गट विकास अधिकारी संदीप दळवी,गट शिक्षण अधिकारी शबाना शेख, सहायक गट विकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक गावेत्री, चाईल्डलाइन समन्वयक महेश सूर्यवंशी, स्नेहालय उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम, प्रवीण दरंदले, शुभम डहारे, विनायक महाले,तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




