
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर – शहरातील शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत सैलानी बाबाची प्रस्तावित रॅली रद्द करण्यात आली आहे. शहरातील संवेदनशील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय श्रीराम संघाने दिलेल्या निवेदनाची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला.
दि.२६ मार्च २०२६ रोजी श्रीरामपूर येथे पारंपरिक श्रीरामनवमी उत्सवानिमित्त निघालेल्या भगवा झेंडा मिरवणुकीदरम्यान मशिदीमधून झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या घटनेत काही हिंदू तरुण जखमी झाल्याची नोंद असून एक जणाला आपला डोळा गमवावा लागलेला आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
या पार्श्वभूमीवर “राष्ट्रीय श्रीराम संघ” तर्फे पोलिस प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती कडक पावले उचलण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच काही संवेदनशील मिरवणुकांबाबत योग्य नियोजन व नियंत्रण ठेवण्याची विनंतीही करण्यात आली होती.
राष्ट्रीय श्रीराम संघाच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत पोलिस व प्रशासनाने परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच सामाजिक सलोखा अबाधित राहावा या उद्देशाने सैलानी बाबाची रॅली रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रशासनाच्या या निर्णयाचे शहरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, शांतता व सौहार्द कायम राखण्यासाठी सर्व समाजघटकांनी सहकार्य करावे,असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.




