
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी –जिल्ह्यामध्ये नुकताच बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस होऊन गेलेला असून या पावसामुळे या जमिनीत सुप्तावस्थेत असलेले हुमणीचे भुंगेरे बाहेर पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि या भुंगेऱ्यांचे वेळीच नियंत्रण केले तरच पावसाळ्यामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढणार नाही अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वरचे पीक संरक्षण विभागाचे प्रमुख भरत दवंगे यांनी दिली.
शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन बियाणांच्या जाती बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी २९ मे ते १२ जून २५ या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान ही देशव्यापी मोहीम सुरू झाली. संस्थेचे अध्यक्ष तथा अहिल्यानगरचे पालकमंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रियाताई ढोकणे,संचालक डाॅ.उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, केंद्र, आणि राज्य पातळीवरील संस्था, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि आत्मा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता, श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव ,अकोले, संगमनेर आणि पारनेर या तालुक्यांमध्ये ही मोहीम सुरु आहे. या अंतर्गत आयोजित जनजागृती कार्यक्रमात दंवगे बोलत होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, एन. आय. ए. एम. चे डाॅ. विजय काकडे, डॉ. गोरक्ष वाकचौरे, के. व्ही. के. चे शास्त्रज्ञ शांताराम सोनवणे,डॉ.प्रियंका खर्डे,डॉ, विलास घुले,सज्जला लांडगे, डॉ. विठ्ठल विखे, कैलास लोंढे आणि बचत गटातील महिला, शेतकरी उपस्थित होते.
श्री.दवंगे यांनी सांगितले की दरवर्षी पहिला पाऊस पडल्यानंतर या हुमणीची भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात आणि रात्रीच्या वेळी कडुलिंब, बोर, बाभूळ किंवा चिंचेच्या झाडावर एकत्रित जमा होतात आणि झाडांचा पाला खातात. सकाळ झाल्याबरोबर हे भुंगेरे पुन्हा जमिनीत जातात आणि यातील मादी भुंगेरा जमिनीत अंडी टाकण्यास सुरुवात करतो. हे भुंगेरे सर्वसाधारण तीस दिवस जगतात आणि दररोज दोन अंडी जमिनीत टाकतात. या अंड्यामधून दहा ते पंधरा दिवसानंतर हु मणीची अळी जन्म घेते आणि एकदा जन्म झाल्यानंतर ही ळी जवळजवळ आठ महिने जमिनीमध्ये जिवंत राहते.या काळात ही अळी पिकांची मुळे कुरतडून खाते. त्यामुळे ऊस, मका, बाजरी, भुईमूग यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. ते टाळण्यासाठी या हुमणी अळीचे वेळीच नियंत्रण होणे आवश्यक आहे.
हुमणी अळीचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करण्यासंदर्भात श्री दवंगे यांनी सांगितले की या किडीचे भुंगेरे रात्रीच्या वेळी बाहेर पडतात आणि कडुनिंब बाभूळ किंवा बोरीसारख्या झाडांवर पाला खाण्यासाठी एकत्र जमा होतात. असे हे एकत्र झालेले भुंगेरे शक्य असल्यास रात्रीच्या वेळी प्रकाश सापळ्याचा वापर करून एकत्रित पकडून नष्ट केल्यास या किडीचा प्रादुर्भाव भविष्यात वाढत नाही. हुमणीचे भुंगेरे प्रकाश सापळ्याचा वापर करून एकत्रितपणे नष्ट करणे हा या किडीवर अतिशय रामबाण प्रतिबंधात्मक उपाय आहे. कारण भुंगेरे एकत्रित पकडून नष्ट केल्यास जमिनीमध्ये या किडीची अंडी पडणार नाहीत आणि त्यामुळे हुमणी अळीचा जन्मच होणार नाही.
याशिवाय जून जुलै महिन्यामध्ये मेटारायझियम अनिसोपली या जैविक कीटकनाशकाचा प्रति एकरी दोन लिटर या प्रमाणामध्ये सेंद्रिय खताबरोबर किंवा स्लरीसोबत शेतात वापर करावा. उस किंवा मका सारख्या पिकांमध्ये पिकाला भुजवटा देताना किंवा रासायनिक खतांची मात्रा टाकताना प्रति एकरी दहा किलो ३ टक्के दाणेदार फिप्रोनील हे कीटकनाशक शेतात वापरावे असे श्री दवंगे यांनी सांगितले.
ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये जर या हुमणी अळीचा प्रादुर्भाव जास्त वाढला तर पिकांमध्ये ठिबकच्या साह्याने किंवा वाहत्या पाण्यासोबत फिप्रोनील ४०% अधिक इमिड्याक्लोप्रिड ४०% हे संयुक्त कीटकनाशक १५० ग्रॅम प्रति एकरी शेतात सोडावे असे आवाहन करत त्यांनी करत विविध पिकांतील रोग-किड नियंञण विषयी मार्गदर्शन केले. अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट गांवपातळीवर आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारित पिके, पशुपालन, मत्स्यपालन, तसेच विविध सरकारी योजना आणि धोरणांची माहिती दिली जात आहे. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना सुधारित कृषी तंत्रज्ञान, बाजारपेठ नियोजन, शासकीय योजनांचे फायदे, नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर याविषयी मार्गदर्शन होत असून गावोगावी मोठा प्रतिसाद मिळत आहे.
