
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी- गोपाल शिंदे
राहाता – भारताच्या इतिहासात आपल्या अद्वितीय सामाजिक, धार्मिक आणि राजकारणातील कार्याने अढळ स्थान मिळवलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राहाता येथील वीरभद्र मंदिरात राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने एक भव्य जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भैय्या बेग यांनी उपस्थितांना उद्देशून प्रभावी आणि अभ्यासपूर्ण भाषण केले.
सागर बेग यांनी आपल्या भाषणात अहिल्याबाईंच्या धर्मकार्याचा गौरव करताना सांगितले की,जिहादी मोगल आक्रमकांनी नष्ट केलेल्या अनेक हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्याबाईंनी केवळ भारतातच नव्हे, तर आज पाकिस्तान व बांगलादेश या वेगळ्या मुस्लिम राष्ट्रांमध्येही केला असल्याचे दिसते त्यांनी या मंदिरांना पुन्हा पवित्र करून श्रद्धेचे केंद्र बनवले. हे कार्य आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरते आणि प्रत्येक भारतीयाने याचा अभिमान बाळगावा,असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. ते पुढे म्हणाले, “अहिल्याबाईंनी नद्यांवर घाट बांधले,मंदिरांना जमिनी दान दिल्या, दिवाबत्तीची कायमस्वरूपी व्यवस्था केली.त्या कट्टर शिवभक्त होत्या,परंतु त्यांची भक्ती संकुचित धार्मिकतेपुरती मर्यादित नव्हती.त्या युद्धकला, प्रशासन आणि राजकारण या सर्वच क्षेत्रात पारंगत होत्या.” आपल्या भाषणात त्यांनी अहिल्याबाई आणि राघोबादादा पेशवे यांच्यात घडलेल्या ऐतिहासिक प्रसंगाचा उल्लेख करत सांगितले की, एकदा रघुनाथराव पेशवे (राघोबादादा) यांनी होळकरांचे संस्थान खालसा करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा अहिल्याबाईंनी एक सूचक खलिता त्यांना पाठवला होता,ज्यात लिहिले होते “राघोबादादा, तुम्ही पराक्रमी योद्धा आहात. पण एका स्त्रीकडून जर तुमचा पराभव झाला,तर तुमच्या कीर्तीला डाग लागेल.” या एका वाक्यानेच राघोबादादा गार झाले आणि त्यांनी चढाईचा निर्णय मागे घेतला. इंदूरच्या किल्ल्यावर झालेल्या त्यांच्या भेटीनंतर हे युद्ध टळले.हा प्रसंग अहिल्याबाईंच्या मुत्सद्देगिरीचे आणि मानसिक सामर्थ्याचे उत्तम उदाहरण आहे,असे बेग यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित धर्मरक्षक कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. राष्ट्रीय श्रीराम संघाचे आकाश बेग,तालुकाध्यक्ष मदन भाऊ मोकाटे, राहाता शहराध्यक्ष निलेश गिधाड, दीपक पोकळे,योगेश निकम,महेश कोते,माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ,मुकुंद नाना सदाफळ,सोपान काका सदाफळ,भाऊसाहेब धुमसे,संपत जाधव, डॉ.रघुनाथ बोठे,राजेंद्र गायकवाड,मारुती गिधाड,साहेबराव निधाने, यांच्यासह सकल धनगर समाज राहाता तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कार्यक्रमात अहिल्याबाईंच्या कार्याची माहिती देण्यात आली आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवा करण्याचा संकल्प अनेकांनी व्यक्त केला. राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या जयंती उत्सवाने राहाता शहरात धार्मिक व सांस्कृतिक चेतना जागृत केली.
