महाराष्ट्रसामाजिक

थाटमाट नाही, डीजेलाही नकार! चौधरी–गुरोडा कुटुंबाचा साधेपणात विवाहाचा आदर्श; नाशिकमध्ये १०० पाहुण्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – लग्न म्हणजे प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो..प्रत्येक जन्मदात्या आई-वडिलांचे स्वप्न असते की आपल्या मुला-मुलीचे लग्न प्रशस्त मंगल कार्यालयात,धूमधडाक्यात, हजारो पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडावे. यामध्ये डीजे, मिरवणूक, पंगत, पाहुण्यांचा सन्मान अशा गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. मात्र वाढते खर्च, कर्जबाजारीपणा आणि सामाजिक स्पर्धा लक्षात घेता, जळगाव येथील मराठा समाजाने लग्नामध्ये कोणताही मोठेपणा न करण्याचा निर्णय घेवून अतिशय साधेपणाने लग्न समारंभ पार पडला असून या विवाहाने समाजापुढे आदर्श उभा केला आहे.

 

 

राहाता तालुक्यातील जळगाव येथील प्रगतशील शेतकरी अण्णासाहेब बन्सी चौधरी यांच्या सुपुत्राचे लग्न, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील राजू देऊ गुरोडा यांच्या कन्येशी, जमले या लग्नामध्ये कुठलाही अनावश्यक खर्च न करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबातील थोर मोठ्यांनी घेतला.यावेळी हा विवाह सोहळा अतिशय साध्या पद्धतीने नाशिक येथील चिंतामणी मंगल कार्यालयात पार पडला. विशेष म्हणजे हे लग्न फक्त १०० पाहुण्यांच्या उपस्थितीत, एकाच दिवशी कुठलाही थाट न करता पार पाडण्यात आले.

 

 

लग्नातील नवदांपत्य चि.प्रविण व चि. सौ. का. मनस्वी हे दोघेही उच्चशिक्षित असून,त्यांनी मराठा समाजाने लागू केलेल्या नव्या आचारसंहितेचा आनंदाने स्वीकार करत गृहस्थ आश्रमात प्रवेश केला त्यांच्या या समजूतदार भूमिकेमुळे समाजात नवा आदर्श निर्माण झाला आहे. प्रविण अण्णासाहेब चौधरी सध्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, कोळपेवाडी येथे नोकरीस आहेत.

 

 

या विवाहसोहळ्यात मराठा समाजाच्या नव्या आचारसंहितेचे पालन करण्यात आले. यात डीजे बंदी, प्री-वेडिंग शूट न करणे, हार घालताना वर उचलणे टाळणे, कर्ज घेऊन खर्च न करणे, दारू पिऊन नाचणे बंद करणे, हुंडा न घेणे, मानपान किंवा भेटवस्तू न घेणे आणि साखरपुडा, हळद, आणि लग्न एकाच दिवशी पार पाडणे यांचा समावेश होता.विशेष म्हणजे, वधूपक्षाने नवरीसोबत ‘एकल करवली’ पाठवली नाही, हे ही एक महत्त्वाचे पाऊल ठरले. अहिल्यानगर जिल्ह्यात अशा स्वरूपाचा विवाह प्रथमच घडून आला असल्याने, या दोन्ही कुटुंबांचे समाजात मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.

 

दोन्हीही परिवाराने सामाजिक जबाबदारीने सजग निर्णय घेत, भपकेबाज खर्च टाळून साधेपणाचा मार्ग स्वीकारला असून या विवाहसोहळ्यामुळे मराठा समाजात कौतुकाची लाट उसळली आहे. इतर कुटुंबांनीही यापासून प्रेरणा घ्यावी, अशी भावना समाजातील ज्येष्ठ मंडळींनी व्यक्त केली आहे.

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!