
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगाव –केंद्र सरकारच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच प्रत्यक्ष कर विभागाने दि.२७ मे रोजी स्वतंत्र प्रेस नोट जाहीर केली असून, येत्या ३१ मार्च २०२५ रोजीचे आयकर विवरणपत्र (ITR) भरण्यासाठी मुदत वाढ करीत असल्याचे सांगितले आहे. अशी माहिती नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन अध्यक्ष नितीन डोंगरे यांनी दिली.
आर्थिक वर्ष २०२४-२५ (म्हणजेच मूल्यांकन वर्ष २०२५-२६) साठी आयकर विवरण पत्रक भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ होती, त्याऐवजी आता दि. १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत करदात्यांना त्यांची विवरणपत्रके दाखल करता येऊ शकतील अशा आशयाचा मजकूर यामध्ये नमूद करण्यात आल्याचे दिसून येते आहे.अर्थातच याची अधिकृत अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होईल अशी आशा आहे.प्रत्यक्ष कर नियामक मंडळाने ज्या आयकर विवरणपत्रकांसाठीची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ होती, त्याची अंतिम तारीख आता १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे.
अशी मुदतवाढ का दिली असावी? या प्रश्नाचा विचार केला तर असे दिसून येते की, आयकर आकारणी वर्ष २०२५-२६( आर्थिक वर्ष २४-२५) साठी आयकर विभागाने नवीन आयकर फॉर्म्स चे नमुने जाहीर केले होते, त्यात मोठे बदल केले गेले होते. या बदलांमुळे फॉर्म्स अधिक पारदर्शक, सुलभ व अचूक माहिती भरण्यायोग्य झाले असल्याचे जरी आयकर विभागाकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष आर्थिक वर्ष पूर्ण होऊन सुद्धा आयकर विभागाकडून फायलिंग युटिलिटी उपलब्ध झालेली नसल्याने करदाते, करसल्लागार आयकर विवरणपत्रके दाखल करू शकत नव्हते.आयकर विभागाकडून सुद्धा त्यांच्याकडील संगणक सिस्टीमची तयारी करणे, सॉफ्टवेअर तयार करणे, त्याची चाचणी व युटिलिटीजच्या टेस्टिंगसाठी अधिक वेळ लागणार असल्याचे यावरून दिसून येते.
दुसरे असेही कारण असू शकते की,कर कपातीची म्हणजेच टीडीएस बाबतची स्टेटमेंट्स ( जी ३१ मे २०२५ पर्यंत भरणे आवश्यक) त्यांचे क्रेडिट जूनच्या सुरुवातीस आयकर प्रणालीमध्ये करदात्यांना तपासणीसाठी उपलब्ध होणार असेल, तर साहजिकच करदात्यांना त्यांचे विवरणपत्रक दाखल करण्यासाठी,काहीही कारण नसताना विलंब होऊ शकतो. करदात्याकडे त्याची सर्व माहिती उपलब्ध असताना सुद्धा केवळ आयकर प्रणालीमार्फत २६एएस, एआयएस सारखी माहिती तपासून बघण्यासाठी, आयकर विभागाच्या चुकीमुळे करदात्यास विलंब लागू शकत होता.
या मुळे, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार आता विवरणपत्रक दाखल करण्यासाठीची ३१ जुलै २०२५ ही जी, मूळ अंतिम तारीख होती. ती आता १५ सप्टेंबर २०२५ करण्यात आली आहे. यासाठी वेगळं अधिसूचना पत्रक लवकरच जाहीर केलं जाईल.अशी आशा आहे करदात्यांना रिटर्न भरताना सुलभता व पुरेसा वेळ देणे.बदललेल्या प्रणालीनुसार करदात्यांना योग्य तयारी करता यावी यासाठी असा अतिरिक्त वेळ दिलेला असून, आयकर विभागाला सुद्धा त्यांच्या प्रणालीची अचूकता आणि प्रक्रियेची पारदर्शकता कायम ठेवायची असल्याचे यावरून दिसून येते.
