
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – सन-१९५२ पासून प्रलंबित असलेल्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पश्चिमेस अरबी समुद्रास वाहून जाणाऱ्या पाण्याचा शेती सिंचनास फायदा होण्यासाठी ३० वळण योजनांच्या सुमारे ९० टीएमसी पाण्यासाठी आर्थिक तरतूद करावी यासाठी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकतीच केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची शिष्टमंडळासह भेट घेतली असून त्यांनी याबाबत सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांचे काम शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या व औरंगाबाद (छ.संभाजीनगर) येथील वकील संघाचे माजी अध्यक्ष व शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे यांच्या मोफत विधी सहाय्याने निळवंडे कालवा कृती समितीने मार्गी लावले आहे.वर्तमानात वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीपथावर आहे.मात्र निळवंडे धरणाची पाणी क्षमता केवळ ८.३२ टी.एम.सी.असून त्या अंतर्गत ६८ हजार ८७८ हेक्टर लाभक्षेत्र सिंचनाखाली आणणे हे जलसंपदा विभागापुढे मोठे आव्हान ठरणार आहे.
त्यामुळे दुष्काळी गावांना शेती सिंचनासाठी पाणी कमी पडणार आहे.याशिवाय गोदावरी खोरे तुटीचे आहे.या गोदावरी,प्रवरा,मुळा कालव्यांच्या लाभक्षेत्रात शेती आणि बिगर सिंचनाचे पाणी कमी पडत आहे.भविष्यात नाशिक पूर्व,शिर्डी, समृद्धी आणि सुरत चेन्नई या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गालगत उद्योग वाढणार असून बिगर सिंचन आणि उद्योगांसाठी पाणी कमी पडणार आहे.त्यामुळे भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील अरबी समुद्रास वाहून जाणारे कोकणासह जवळपास ३०० ते ४०० टी.एम.सी.पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणे ही वर्तमान काळाची गरज ठरली आहे.
मात्र गेली ७५ वर्षे या प्रश्नाकडे सातत्याने सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष झाले आहे.मात्र आगामी काळात हे दुर्लक्ष परवडणारे नाही ही गरज ओळखून निळवंडे कालवा कृती समिती आणि शेतकरी संघटना यांनी शिर्डीचे (उबाठा) सेनेचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे लक्ष वेधून घेतले होते.त्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन लोकसभा निवडणुकीत दिले होते.त्यानुसार त्यांनी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट आयोजित केली होती.त्यावेळी त्यांनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.दरम्यान या संबंधी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री सी.आर.पाटील यांची संसद भवनात आयोजित बैठकीत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे,निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,सचिव कैलास गव्हाणे,संघटक नानासाहेब गाढवे,सहसंघटक उत्तमराव जोंधळे,विलास गुळवे,तानाजी शिंदे,सौरभ शेळके,महेंद्र सोनवणे,बाळासाहेब थोरात,दत्तात्रय थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,विजय शिंदे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
“दरम्यान या योजनेत संगमनेर तालुक्यातील साकुर पठार दुष्काळी भाग मुळा नदीच्या लाभक्षेत्रात आणणेसह,तळेगाव दिघे,नान्नज, तिगाव, करुले आदी दुष्काळी भागाला भोजापूर धरणात पश्चिमेचे अतिरिक्त निर्माण होणारे पाणी वळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे”-खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसभा मतदार संघ.
