
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
नेवासा – नेवासा तालुक्यातील पिचडगाव शिवारात वडिलोपार्जित जमिनीवर सुरू असलेला संघर्ष न्यायालयीन लढाई जिंकूनही संपलेला नाही.प्रवीण बाळासाहेब दरंदले आणि त्यांच्या आई स्वाती दरंदले यांना नेवासा कोर्ट, औरंगाबाद हायकोर्ट आणि दिल्ली सुप्रीम कोर्ट या तिन्ही न्यायालयांनी जमिनीवरील हक्क आणि वारसत्त्व स्पष्टपणे मान्य केलं आहे. तरीही त्यांच्या वडिलांचे सख्खे बंधू चंद्रकांत दरंदले यांच्याकडून सदर जमीन भावाच्या वारसदारांना मिळू नये म्हणून कुरघोड्या रचल्या जात आहे.
२००१ साली प्रवीण यांचे वडील स्व.बाळासाहेब शामसुंदर दरंदले यांचे निधन झाले. तेव्हा प्रवीण केवळ दोन वर्षांचे होते. त्यांच्या वडिलांच्या वडिलोपार्जित जमिनीत २/३ हिस्सा आहे हे औरंगाबाद च्या न्यायालयीन निकालांमध्ये स्पष्ट झाले आहे.पण चुलते चंद्रकांत दरंदले यांनी त्यावेळी हिस्सा न देण्याच्या हेतूने थेट सख्या भावाच्या मरणपंथाच्या अवस्थेत जबरदस्तीने सह्या घेऊन जमीन जागा आपल्या स्वतःच्या नावावर करून घेतली आणि आजवर ताब्यात ठेवली आहे.चंद्रकांत दरंदले हे गेली २० वर्षं या जमिनीतून शेतकी करून स्वतःउत्पन्न घेत आहेत. मात्र त्या उत्पन्नातील एक रुपयाही प्रवीण व त्यांच्या आईला दिलेला नाही. ही गोष्ट केवळ अन्याय नाही, तर एका कुटुंबाची उपजीविका हिरावून घेण्यासारखी आहे.
हक्क मागितला तर दमदाटी!
जमिनीबाबत विचारणा केली असता, चंद्रकांत दरंदले आणि त्यांचे कुटुंब दमदाटीची भाषा वापरतात. “कोर्टात जा”, “बघून घेऊ” अशा प्रकारचे बोलणे करून प्रवीण आणि त्यांच्या आईवर मानसिक ताण निर्माण केला जातो.
पत्रकार मुखवटा;पण कृत्ये भस्मासुराची
चंद्रकांत दरंदले स्वतःला पत्रकार म्हणवून घेतात, पण मृत्यूपंथाला लागलेल्या भावाच्या हातून जबरदस्तीने सह्या घेणं, न्यायालयाचे आदेश झुगारणं आणि वारसांचा हिस्सा न देणं, हे भस्मासुरासारखे वर्तन आहे.
“हा लढा जमिनीसाठी नाही, वडिलांच्या सन्मानासाठी आहे” – प्रवीण दरंदले
प्रवीण दरंदले म्हणतात,“मी न्यायालयात केस जिंकली आहे, पण अजूनही जमिनीवर ताबा मिळालेला नाही. ताबा मिळायचा असल्यास चंद्रकांत दरंदले हे काहींना काही अडचण अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.हा लढा फक्त जमिनीसाठी नाही तो माझ्या वडिलांच्या सन्मानासाठी आणि माझ्या आईच्या हक्कासाठी आहे.”समाजाने डोळे उघडावे तीन न्यायालयांचे आदेश असूनही जर अन्याय होत असेल, तर ही व्यक्तीगत नव्हे तर सामाजिक शोकांतिका आहे. समाजाने अशा खोट्या मुखवट्यांमागील सत्य उघड करण्यासाठी पुढे आले पाहिजे ही वेळ आहे.
