
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील वाकडी-धनगरवाडी परिसरात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.शेतकरी बाळासाहेब शेळके यांच्या शेतात (गटनं.१) वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात ठेवलेल्या भक्षाच्या शोधात मंगळवारी रात्रीच्या सुमारास ३ बिबटे पिंजऱ्या जवळ आले.त्यापैकी १ बिबट्या जेरबंद झाला आहे.मात्र; यादरम्यान दोन बिबटे रात्रभर पिंजऱ्यापाशी बिबट्याची सुटका करण्याचा प्रयत्न करत होते.नागरिक सतर्क झाल्याने वेळीच बिबट्यानी धूम ठोकली.परंतु परिसरामध्ये अजूनही बिबट्यांचा मुक्त संचार होत आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वनविभागाने वेळीच बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी धनगरवाडी-दिघी वाकडी-चितळी परिसरातील समस्त नागरिकांनी केली आहे.
घडलेली सविस्तर घटना अशी की, राहता तालुक्यातील चितळी धनगरवाडी व वाकडी परिसरात बिबट्याची वाढती दहशत परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत दोन चिमुकल्यांचे बळी तसेच मानवी वस्तीच्या परिसरात दिवसेंदिवस बिबट्यांचा होणारा मुक्त संचार लक्षात घेऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना करणेकामी वनविभागाकडून चितळी-वाकडी-धनगरवाडी भागात ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत.यापैकी एक पिंजरा धनगरवाडी शिवारांमधील शेतकरी बाळासाहेब शेळके यांच्या मालकीच्या (गट नं १) मध्ये लावण्यात आला होता.
मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बाळासाहेब शेळके व पुतण्या राहुल शेळके घराशेजारील शेतात मोटार चालू करण्यास गेले असताना.त्यांना पिंजऱ्यामध्ये हालचाल जाणवू लागली पिंजऱ्यामध्ये काय हालचाल होत आहे हे पाहण्यासाठी शेतकरी बाळासाहेब शेळके,राहुल शेळके गेले असताना त्यांना बिबट्या जेरबंद झाल्याचे समजले.यावेळी त्यांनी परिसरातील सर्व शेतकऱ्यांना संपर्क साधून घटनास्थळी बोलावून घेतले.
वाकडीगावच्या सरपंच सौ.आहेर यांनी व स्थानिक शेतकऱ्यांनी कोपरगाव वनपरिक्षेत्राचे वनरक्षक पी. डी.गजेवार यांना ८.३० वाजेच्या सुमारास तात्काळ दूरध्वनीद्वारे संपर्क साधला.धनगरवाडी भागात बिबट्या जेरबंद झाला अशी माहिती दिली.वनविभागाला घटनेची माहिती मिळताच कोपरगाव वनविभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पी. डी, गजेवार, प्राणीमित्र अजय बोधक,यांनी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घटनास्थळी जावून भेट दिली.
व पुढील उपाययोजना करण्यासाठी श्रीरामपूर तालुका वनपाल विठ्ठल सानप यांना सूचित करण्यात आले.सकाळी वनपाल विठ्ठल सानप यांनी घटनास्थळी धाव घेवून बिबट्यास ताब्यात घेतले असून जुन्नर जिल्ह्यातील माणिकडोह याठिकाणी बिबट्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.वाकडी -धनगरवाडी परिसरात मानवी वस्तीच्या परिसरातील काकडाई मंदिराच्या जवळ १९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास घराजवळ खेळत असणाऱ्या साडेतीन वर्षीय प्रथमेश वाघ साडेतीन वर्षीय बालकास बिबट्याने अचानक हल्ला चढवून सुमारे सहाशे फूट फरपटत नेवून गिन्नी गवताच्या शेतात ठार केले या घटनेला साधारणपणे आठ महिने उलटले.ही घटना घडल्यानंतर देखील नरभक्षक बिबट्या मोकाट होता. त्यानंतर धनगरवाडी परिसरातील स्नेहल राशिनकर सहा वर्षीय चिमुकलीला बिबट्याने घरापासूनच ओढत नेवून प्राण घातक हल्ला करून ठार केले.धनगरवाडी-वाकडी -चितळी परिसरामध्ये अशा दुर्दैवी घटना सातत्याने घडत आहेत.यामुळे नागरिकांमधून वनविभागाच्या कार्यप्रणालीवर मोठा रोष व्यक्त केला जात आहे.
नागरिकांचा आक्रोश वनविभागाची कार्यप्रणाली;अनेकदा अपयशी?
चितळी-धनगरवाडी-वाकडी परिसरात बिबट्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे नागरिक रात्री तर काय दिवसाही बिबट दर्शन देतात.अनेकदा नागरिकांनी वनविभागाला संपर्क साधूनही दाद मिळत नाही उलट वनविभागात कार्यरत असणारे ‘वनपाल वनरक्षक’ असे जबाबदार अधिकारी उडवा उडवीचे उत्तरे देतात.शाब्दिक चकमक होते परिसरातील बिबट्यांची संख्या पाहता ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे परंतु;नरभक्षक बिबट्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यास वनविभागाची कार्यप्रणाली अनेकदा अपयशी ठरत आहे.नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वनविभागाचा हलगर्जीपणा बिबट्याला नेण्यासाठी; चक्क भाडोत्री वाहन!
मंगळवारी धनगरवाडी शिवारात रात्री बिबट्या जेरबंद झाला सकाळी. वनविभागाचे अधिकारी घटनेच्या ठिकाणी आले. यावेळी बिबट्या नर-आहे की मादी असा प्रश्न विचारताच वनपालांनी उत्तर देणे टाळले.बिबट्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यासाठी शासनाच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकृत वाहन असणे गरजेचे होते मात्र;असे घडले नाही बिबट्याला नेण्यासाठी वनविभागाला चक्क..भाडोत्री वाहन बोलवण्याची वेळ आलेली आहे.नागरिक वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
