
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – मुलगी अजून फुलायचीच होती… तिचे स्वप्न अजून उमलायचेच होते पण नियोजित बालविवाहामुळे तिच्या आयुष्यावर काळोख पसरू पाहत होता अशा वेळी एक जागरूक नागरिक पुढे आला, आणि त्याने दिलेल्या सूचना देवून एका फोनकॉलने तिचे आयुष्य वाचले.
१४ मे रोजी, स्नेहालयच्या उडान प्रकल्पाच्या हेल्पलाइनवर एका सजग नागरिकाने एका संभाव्य बालविवाहाची माहिती दिली. माहिती मिळताच उडान पथकाने तातडीने हालचाल करत संबंधित गावात चौकशी सुरू केली. संबंधित मुलीच्या कागदपत्रांच्या आधारे ती केवळ १५ वर्षांची असल्याचे स्पष्ट झाले, आणि तिचा विवाह २२ वर्षीय युवकासोबत ठरणार होता.
भारतीय कायद्यानुसार मुलीचे किमान विवाह वय १८ वर्षे, आणि मुलांचे २१ वर्षे असणे बंधनकारक आहे. त्यामुळे हा विवाह स्पष्टपणे बालविवाहाच्या गुन्ह्यात मोडत होता.प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासन, चाईल्ड हेल्पलाइन 1098, महिला व बालविकास विभाग, ICDS, जिल्हा बाल संरक्षण यंत्रणा आणि बाल कल्याण समिती यांच्यासमवेत संयुक्त हस्तक्षेप करण्यात आला.
त्याच दिवशी संबंधित पालकांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. विवाहाची कबुली मिळाल्यावर कायद्याची माहिती देण्यात आली. पुढील कायदेशीर प्रक्रिया बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आली आहे.ही कारवाई म्हणजे संवेदनशीलता, सजगता आणि समन्वयाचे उत्तम उदाहरण आहे. एकाच दिवशी विविध यंत्रणांनी जबाबदारीने काम करत एक बालपण वाचवले.
स्नेहालयचा उडान प्रकल्प हा केवळ बालविवाह थांबवण्यापुरता मर्यादित नाही, तर मुलींच्या संरक्षण, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी झटणारा एक सामाजिक बदलाचा प्रवास आहे. गावपातळीवरील स्वयंसेवक, शाळा, स्थानिक संस्था आणि प्रशासनाच्या सहकार्याने उडान ही आशेची किरणं पसरवत आहे.
