
( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
वाकडी – राहाता तालुक्यातील वाकडी गावातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे चितळी येथे होणारे स्थलांतर थांबववून सर्वसामान्य खातेदारांची गैरसोय टाळावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापनास देण्यात आला आहे.
याबाबत वाकडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत वाकडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक रोहन आहिरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,महाराष्ट्र बँक शाखेची तब्बल ४० ते ४२ वर्षांपूर्वी वाकडी येथे स्थापना करण्यात आली या शाखेच्या माध्यमातून वाकडी गावातील सर्वसामान्य शेतकरी, विद्यार्थी,व्यापारी यांना कर्ज वितरित केले आहे.त्या कर्जाची परतफेड चांगल्या प्रकारे करून ही बँक नफ्यात आणली.परंतु गेल्या तीन वर्षांपासून सततचा दुष्काळ व अतिवृष्टी यामुळे शेतीचे आर्थिक नुकसान झाले यामुळे शेतकरी वर्गाचे खूप नुकसान झाले याकारणास्तव शेतकरी वर्ग पैसे वेळेवर भरू शकले नाही.
शिवाय विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने सत्येवर आल्यावर सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले.नंतर सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे यासाठी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्तीचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी उपोषण केले यावर सरकारने काहीच दिवसांत कर्जमाफी होईल असे लेखी देवून शेतकऱ्यांना आश्वासन दिले.त्यामुळे महाराष्ट्र बँकेची संपूर्ण वसुली होणार आहे.
राहाता तालुक्यातील वाकडी हे गाव तालुक्याच्या केंद्रस्थानी असून सर्वात जास्त लोकसंख्या असणारे गाव म्हणून ओळखले जाते यामुळे चितळी येथे बँकेचे स्थलांतर करू नये अन्यथा वाकडी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनात दिला आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके, शंकरराव लहारे,सावळेराम आहेर,बाळासाहेब शेळके, नंदकुमार कोळपकर, विश्वनाथ काळे, एमबी भोंडे,दादासाहेब शेळके, रमेश एलम,आदी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी यांच्यासह वाकडी परिसरातील बँक खातेदार मोठ्या संख्येत उपस्थित होते.
