
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
प्रतिनिधी – अक्षय काळे
कोपरगाव-(ता.३१)
कोपरगाव-बीड जिल्ह्यातील सरपंच कै.संतोषजी देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष-संताप व्यक्त केला जात आहे. धर्म-जात यांचा विचार न करता संपूर्ण समाज याविरोधात एकवटलेला दिसतो आहे. याची प्रचिती मागील आठवड्यात बीड शहरात बघावयास मिळाला लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी जमला होता हे विशेष भ्रष्टाचार बोकाळल्यामुळे व राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळेच फार मोठ्या प्रमाणावर बंदूक परवाने दिलेले आहेत असे निदर्शनास येत आहे.
आता खरे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील दिलेले बंदूक परवानेही स्थगित ठेवून सर्वच परवान्याची पुनःश्च पडताळणी करणे गरजेचे आहे.असे केल्याने चुकीच्या-अपात्र व्यक्तींना दिलेले बंदूक परवाने रद्द करता येथील.गुन्हे घडण्याची वाट न पाहता पोलिसांनी आधीच खबरदारी घेतली तर गुन्हेगारी -गुंडगिरीस नक्कीच पायबंद बसू शकतो.आपल्या जिल्ह्यातही अधिकृत व अनधिकृत बंदूक-पिस्तुले-कट्टे असणारच यात तीळ मात्र शंका नाही.कोपरगाव तालुक्यात व शहरातही अनेकदा गोळीबाराचे प्रकार घडलेले आहेत. काही महाभागानी तर प्रसिद्धी व राजकीय स्वार्थासाठी स्वतःच स्वतःवर गोळीबार घडवून आणल्याचे बोगस प्रकार घडवून कोपरगाव शहराला वेठीस धरल्याचे नागरिकांना आठवतच असेल.
म्हणूनच सर्वांच्याच हितासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वच बंदूक परवान्याची त्वरित पडताळणी व्हावी व बीड जिल्ह्याची पुनरावृत्ती आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात होऊ नये हिच अपेक्षा आहे असे कोपरगावचे माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.
