
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर –भारतासह जगातील 25 देशातील अग्रणी विमा कंपनी असलेल्यान्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी करीता नफ्यापेक्षा वंचितांचे सामाजिक कल्याण महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन कंपनीचे रिजनल मॅनेजर प्रेमचंद मोरे यांनी केले.सामाजिक दायित्व जपणाऱ्या या कंपनीने संपूर्ण देशभरात वंचितांचे जीवन बदलण्यासाठी ध्येयवादी आणि उत्तम सामाजिक संस्था निवडून त्यांना आर्थिक सहयोग दिल्याचे श्री.मोरे यांनी नमूद केले.
बहुविध कारणांनी संधीवंचित आणि उपेक्षित असलेल्या मुली – महिलांना पूर्णतः मोफत आणि निवासी स्वरूपात रोजगार शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र *सक्षमा प्रकल्प* स्नेहालय संस्थेने केडगाव येथे उभारला. सक्षमाचे लोकार्पण 11 एप्रिल रोजी झाले.द न्यू इंडिया एश्शुरन्स कंपनीने या संकुलाच्या उभारणीसाठी आर्थिक सहयोग दिला.
यावेळी या कंपनीचे विभागीय व्यवस्थापक प्रेमचंद मोरे आणि अभय अकोले, वरिष्ठ व्यवसाय व्यवस्थापक भगवान पवार, अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष एडवोकेट जयंत ओहोळ, देसरडा भंडारी अकादमीचे संचालक सौ. स्नेहा आणि सीए संदीप देसर्डा,लष्कराच्या अहमदनगर येथील रुग्णालयाच्या प्रमुख कर्नल डॉ. रितिका कारखानीस स्नेहालयाच्या अध्यक्षा जयाताई जोगदंड, सचिव डॉ. प्रीती भोंबे , खजिनदार गीता कौर, विश्वस्त रूपाली मुनोत, पुणे येथील स्वरूपवर्धिनी संस्थेचे संस्थापक संचालक शिरीष पटवर्धन आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रातील 3 बालकांचे दत्तक विधान करण्यात आले. सक्षम केंद्रातील प्रशिक्षण वर्ग प्रयोगशाळा आणि वसतिगृहाच्या कक्षांना राष्ट्रमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई भिमराव आंबेडकर तथा रमाई, पंडिता रमाबाई सरस्वती ,फ्लॉरेन्स नाइटिंगेल, सुलताना चांदबीबी, कल्पना चावला, नगरच्या थोर समाजसेविका जानकीबाई आपटे आदींची नावे देण्यात आलेली आहेत. त्यांचीही उद्घाटने यावेळी झाली.
श्री.मोरे यांनी यावेळी सांगितले की,1919 टाटा उद्योग समूहाचे सर रतन टाटा यांनी न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीची स्थापना केली. त्यामागे निव्वळ व्यावसायिक हेतू नव्हता तर सामाजिक सुरक्षेचा व्यापक दृष्टिकोन होता. विमा या संकल्पनेचे औचित्य भारतीयांना याच कंपनीच्या विश्वासार्ह व्यवहारांमुळे पटले आणि तिचा व्यापक प्रसार झाला. वर्ष 1973 मध्ये कंपनीचे राष्ट्रीयकरण झाले. मागील 106 वर्षांच्या इतिहासात विमा क्षेत्रातील व्यावसायिक उच्च नीती मूल्यांचे पालन न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने केले.
भारतातील सामाजिक विकासाला आपल्या सामाजिक दायित्व भूमिकेनुसार पायाभूत स्वरूपाची मदत करणाऱ्या या कंपनीने यापूर्वी स्नेहालय संस्थेत देह व्यापारातील बळी महिलांसाठी प्रतिष्ठा भवन निर्माण केले. कंपनीने प्रायोजित केलेला नवा सक्षमा प्रकल्प हजारो संकटग्रस्त महिला मुलींना नवजीवन देईल ,असा विश्वास श्री मोरे यांनी व्यक्त केला.
महिलांसाठी कार्यरत 94 वर्षांच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुधा भालचंद्र कारखानीस विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.भारतातील महिला आणि मुलींच्या सर्वांगीण अवस्थेबद्दल या कार्यक्रमात अभ्यासू मांडणी केली. त्या म्हणाल्या की, मुली आणि महिलांवर अत्याचार होत असताना सुशिक्षित, देशभक्त इत्यादी बिरूद मिरवणारे दुर्लक्ष करताना दिसतात.सामाजिक कर्तव्यहीनतेमुळे मुलींचे आणि महिलांचे जीवन संकटात असताना आजही बहुतांश लोक बघ्याची भूमिका घेतात, हे देश म्हणून चिंताजनक आहे.
स्नेहालय संस्थेच्या बहुविध प्रकल्पांमुळे अहिल्यानगरला जगाच्या सामाजिक नकाशावर अग्रणी स्थान मिळाल्याचे आयुक्त डांगे यांनी नमूद केले. द नॅशनल ऍश्युरन्स कंपनीने सक्षमा केंद्र बांधून देशातील अन्य विमा व औद्योगिक क्षेत्रासमोर आदर्श ठेवला ,असेही ते म्हणाले.सी.ए.संदीप देसर्डा यांनी सक्षमा केंद्रात अकाउंटंट प्रशिक्षणासारखा उपक्रम चालू करण्यात पुढाकार घेण्याची घोषणा केली. सक्षमाचे बांधकाम जेएमआर बिल्डकॉन कंपनीचे अभियंताओंकार म्हसे यांनी केले. वास्तू आराखडा अश्वत्थ डिझाईन स्टुडिओचे आर्किटेक्ट रोहित साळुंखे यांनी केला.गेली चार दशके जिल्हा शासकीय रुग्णालयांमधून परिचारिका प्रशिक्षण देणाऱ्या राजश्री रवींद्र कुलकर्णी यांनी रुग्णसेवा अभ्यासक्रमाचे प्राचार्य पद स्वीकारले.
सक्षमा प्रकल्पात बालमाता, बालवेश्या, अत्याचारित महिला, झोपडपट्टी – आदिवासी आणि ग्रामीण भागातील अल्पशिक्षित गरीब व गरजू मुली , देह व्यापारातून मुक्त झालेल्या महिला, विविध अनाथालयांमधील 18 वर्षे पूर्ण झालेली बालके यांच्यासाठी 3 महिन्यांचा रुग्ण सहाय्यक किंवा बेडसाईड असिस्टंट हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. रोजगार शिक्षणाचे अन्य विविध उपक्रम येथे राबविले जाणार आहेत. हे सर्व उपक्रम मोफत आणि परगावच्या मुला मुलींसाठी निवासी स्वरूपाचे आहेत.रुग्ण सहाय्यक अभ्यासक्रमात 30 तर अन्य अभ्यासक्रमात 70 लाभार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.रुग्ण सहाय्यक अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या मुलींना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.येथील प्रवेशाच्या संदर्भात 8600484444 येथे संपर्काचे आवाहन संस्थेने केले आहे.
