Uncategorized

आदिवासी समाजाला यापुढे घरकुल, रेशन कार्ड यांसारख्या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागणार नाही – माजी खासदार.डॉ. सुजय विखे

आदिवासी वीर एकलव्य जयंतीनिमित्त कोल्हार येथे समाज मेळावा संपन्न

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – आदिवासी वीर एकलव्य जयंतीनिमित्त कोल्हार (ता. राहता) येथे आदिवासी समाजाच्या मेळाव्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते आदिवासी राजा भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित असलेल्या समाजबांधवांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेवून त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

 

या प्रसंगी अध्यक्ष राजू बर्डे यांच्यासह कोल्हार भागातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, माता-भगिनी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. विखे पाटील यांनी या वेळी महत्त्वपूर्ण घोषणा करत, मतदारसंघातील एक दिवस समाजबांधवांसाठी देण्याचा निर्णय घेतला. समाजातील प्रत्येक कुटुंबासाठी व्यक्तिश उपलब्ध राहून त्यांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला. विशेषत वंचित घटकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.आदिवासी समाजाला यापुढे घरकुल, रेशन कार्ड यांसारख्या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागणार नाही, असे स्पष्ट करत, समस्यांचे निवेदन दिल्यास तत्काळ कार्यवाही केली जाईल,असेही ते म्हणाले. 

 

  • “सत्कार न घेण्याचा निर्णय”

जोपर्यंत आदिवासी समाजाच्या समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा सत्कार स्वीकारणार नाही, असा स्पष्ट निर्णय डॉ.विखे यांनी घेतला.समाजहितासाठी महामानवांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन करत,आदिवासी समाजाला वंचित न राहू देता मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे ते म्हणाले. 

 

  • “समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार”

कोल्हार भगवतीपुर येथून या चळवळीची सुरुवात करत आदिवासी समाजाच्या प्रत्येक घरापर्यंत जाऊन समस्या जाणून घेण्याचा संकल्प केला. समाजातील प्रश्न पूर्णतः सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून, समाजाच्या हितासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

 

  • “मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प”

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले जाणार आहे. कोल्हार भगवतीपुर येथून सुरू झालेली ही चळवळ संपूर्ण समाजासाठी परिवर्तन घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!