
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – वाकडी (ता.राहाता) येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चितळी येथे स्थलांतरित करू नये, यासाठी गावातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते, शेतकरी संघटना व नागरिकांनी हनुमान मंदिरात बैठकीचे आयोजन करून आवाज उठवला. या बैठकीत शाखा वाकडीतच कायम ठेवावी, यावर एकमुखी ठराव पारित करण्यात आला.
शाखा स्थलांतरित झाल्यास शेतकरी, महिला, वृद्ध नागरिक आणि सर्वसामान्य खातीधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, असा सूर या बैठकीत उमटला. त्यामुळे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शाखा स्थलांतर रोखण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस शिवाजीराव लहारे, राजेंद्र लहारे, भाऊसाहेब शेळके, विठ्ठलराव शेळके, बापूसाहेब लहारे, बाळासाहेब आहेर, बाळासाहेब कोटे, सुरेश जाधव, निलेश लहारे, संपतराव शेळके, नितीन एलम, सुनील लहारे, वसंतराव लबडे, अनिल शेळके, विजय शेळके, रावसाहेब बाबा शेळके, राजेंद्र रा. लहारे, नवनाथ शेळके, चांगदेव पावसे, तात्यासाहेब गोरे, नारायण शेळके यांच्यासह शेकडो नागरिक, शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीस बँक मॅनेजर व कॅशियर आदमाने साहेब देखील उपस्थित होते. या ठिकाणी झालेल्या निर्णयानुसार पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाधिकारी, बँकेचे पुणे मुख्यालय, नगर विभागीय कार्यालय, आमदार आशुतोष काळे,तसेच माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांना निवेदन पाठवण्यात आले.ग्रामस्थांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जनतेच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी केली असून, पुढील काळात हा विषय अधिक तीव्रपणे मांडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
