
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी- गोपाल शिंदे
श्रीरामपूर – शिरसगाव ग्रामपंचायत हद्दीत शिरसगाव ब्राह्मणगाव रस्त्याचे चालू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून सार्वजनिक निधीचा योग्य वापर न होता सर्व नियम पायदळी तुडवले जात असून ते काम तातडीने बंद करून कामाच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी तज्ञ अभियंत्यांची समिती नेमून ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी शिरसगावचे युवा नेतृत्व व राष्ट्रीय श्रीराम संघाचे शिरसगाव शाखेचे अध्यक्ष रोहित यादव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत शिरसगाव ब्राह्मणगाव रस्त्याचे काम सध्या चालू आहे.श्रीरामपूर तालुक्यातील दोन महत्त्वाच्या गावांना जोडणारा हा रस्ता असून या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते हाच रस्ता पुढे वैजापूर या हमरस्त्याला जोडलेला आहे.सध्या चालू असलेले रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट प्रतीचे चालू असल्याचे रोहित यादव यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
आपल्या तक्रारीत त्यांनी म्हंटले आहे की, रस्त्याला योग्य तो सपाटी देण्यात आलेली नाही,डांबरीकरण अपूर्ण असून अनेक ठिकाणी खड्डे राहिलेले आहे,कामासाठी वापरण्यात आलेली सामग्री ही निकृष्ट प्रतीची असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे,काम करतांना कोणत्याही मानक प्रक्रिया व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याचे दिसून येत नाही तसेच सार्वजनिक निधीचा योग्य वापर न होता काम पुन्हा खराब स्थितीत येण्याची भीतीही यादव यांनी तक्रारीत व्यक्त केली आहे.
रोहित यादव यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे केलेल्या तक्रारीत सदर कामाची तज्ञ अभियंत्यांची समिती स्थापून तपासणी करण्याची मागणी करत भविष्यात या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना अपघाताचा धोका होऊ शकतो अशी भीतीही त्यांनी आपल्या तक्रारीत व्यक्त केली आहे.
