
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर – श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावांतील अकारी पडीत जमिनींच्या वाटपाचा प्रश्न चिघळलेला असताना, हरेगाव मळ्यातील शेती महामंडळाने काटेरी झाडझुडपे काढण्यासाठी जेसीबी मशीन आणली. मात्र, या कामाला अकारी पडीत शेतकरी बांधव आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली. ही माहिती समजताच शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड. अजीतदादा काळे संभाजीनगरहून थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यावर पोहोचले. त्यांनी, “जमिनी मिळाल्याशिवाय कोणतीही झाडे काढू देणार नाही, आम्हावर गुन्हे दाखल करा पण आम्ही येथून जाणार नाही,” अशी ठाम भूमिका घेतली.
दरम्यान,पोलीस निरीक्षक शिवपुंजे यांना राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरध्वनीवरून सूचना देत, “शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर व अकारी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करू नका, त्यांना त्वरित सोडून द्या,” असे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर ऍड.अजीत काळे यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आणि रात्री उशिरापर्यंत सर्व शेतकरी आंदोलनास्थळी थांबले.
ही परिस्थिती पाहून पालकमंत्री विखे पाटील यांनी पुण्याहून तातडीने बाभळेश्वर येथील पायरण्स कृषी विज्ञान केंद्रात बैठक आयोजित केली.याबैठकीस अकारी पडीत जमीनधारक शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीड तास चाललेल्या चर्चेनंतर पालकमंत्र्यांनी “चालू पावसाळी अधिवेशनात अकारी पडीत जमिनी वाटपासंबंधीचा कायदा पास करू, सर्व शेतकऱ्यांना जमिनी मिळतील,” असे ठोस आश्वासन दिले. त्यांनी जमिनीवरील यंत्रसामग्री तातडीने मागे घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
शेतकऱ्यांच्या मागण्यांनुसार आंदोलन स्थगित करण्यात आले. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल सर्व अकारी पडीत शेतकरी बांधवांनी त्यांचे आभार मानले. या बैठकीस शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके, शरद आसणे, सचिन वेताळ (अकारी पडीत जमीन कृती संघर्ष समिती), ऍड. सर्जेराव घोडे, सुरेश ताके, बाबासाहेब वेताळ, सुनील आसणे, अभिषेक वेताळ, बापूसाहेब गोरे, सुदामा आसणे, किशोर फरगडे, बाळासाहेब आसणे आदींसह नऊ गावांतील अनेक शेतकरी उपस्थित होते.
