
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील पंचायत समिती प्रभाग रचनेत रस्तापूर गावाचा सावळी विहीर बुद्रुक गण क्रमांक ४१ मध्ये समावेश करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर या निर्णयावर डॉ. अविनाश चव्हाण यांनी तीव्र आक्षेप यांनी नोंदविला आहे.
नवीन मसुद्यानुसार, पुणतांबा (गण क्र. ४२) या गणामध्ये असलेले रस्तापूर गाव सावळी विहीर बुद्रुक (गण क्र. ४१) मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या बदलामुळे संयुक्त ग्रामपंचायतीच्या अखंडतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वायत्ततेवरही गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्तापूर गावाचा समावेश पुणतांबा गणातच ठेवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश चव्हाण यांनी गंभीर आक्षेप घेतले असून, ही प्रक्रिया राजकीय दबावाखाली घडली आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. प्रभाग रचना करताना कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप वा षड्यंत्र प्रशासनाने मान्य करू नये. गावांची नोंद मूळ स्वरूपातच प्रभागात व्हावी असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पुणतांबा गणात करण्यात आलेल्या बदलामुळे नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या निर्णयामागे कोणाचे राजकीय हितसंबंध कार्यरत आहेत का, असा संशय व्यक्त केला जात असून, जिल्हा प्रशासनाने पारदर्शक चौकशी करून संबंधित ग्रामपंचायतींच्या भूमिका विचारात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिक पातळीवरून जोर धरू लागली आहे.




