महाराष्ट्रसामाजिकस्नेहालय संस्था अहिल्यानगर

रात्र झाली तरी माणुसकी झोपत नाही ;मुक्ती वाहिनी’ची नगर शहरात रात्रगस्त संकटात असलेल्या बालकांसाठी कायम असते सज्ज 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर –अंधारात हरवलेल्यांना प्रकाश दाखवण्यासाठी जर कुणी वाट पाहत असेल, तर तो हात ‘मुक्ती वाहिनी’चा असतो. स्नेहालय संचालित या प्रकल्पाच्या माध्यमातून २१ जूनच्या रात्री अहिल्यानगर परिसरात राबवण्यात आलेल्या विशेष रात्रगस्तीत संकटात असलेल्या बालकांसाठी सामाजिक सजगतेचे एक प्रभावी उदाहरण साकारले गेले.

या गस्तीची सुरुवात रेल्वे स्थानक परिसरातून झाली, जिथे रेल्वे सुरक्षा दलाचे इन्स्पेक्टर विकेश तीमाडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्यासह पोलिस प्रशासनाने संपूर्ण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. रेल्वे स्थानक, माळीवाडा आणि तारकपूर बसस्थानके, महात्मा गांधी मैदान परिसर, सार्वजनिक पार्किंग आणि इतर संवेदनशील भागांमध्ये प्रत्यक्ष भेटी दिल्या गेल्या.

या गस्तीच्या दरम्यान माळीवाडा बस स्थानकावर १६ वर्षीय एक अल्पवयीन मुलगी बेवारस अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि चाईल्ड हेल्पलाइन व बाल कल्याण समितीला माहिती कळवण्यात आली. वैद्यकीय तपासणी करून, समितीच्या आदेशानुसार तिच्यासाठी शासकीय बालगृहात सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली.

गस्तीदरम्यान एक महत्त्वाचा सकारात्मक बदल जाणवला पूर्वीचे अनुभवी स्वयंसेवक पुन्हा या कार्यात सहभागी झाले. पोलीस अधिकारी, रिक्षाचालक, हॉटेल व लॉजिंग मालक, चहावाले, विक्रेते, पार्किंगचे कर्मचारी, सिक्युरिटी गार्ड्स यांनी आपली माणुसकी जागवली. या साऱ्यांनी गस्ती टीमशी संवाद साधला,नव्याने सहभाग दर्शवला आणि अनेकांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘मुक्ती वाहिनी’चा पुनरारंभ म्हणजे बालकांसाठीचा आधार पुन्हा सक्रिय झाला आहे. अनेकांनी आपल्या परिसरात काही बालकांचे हाल जाणवले तर तातडीने माहिती देण्याची तयारी दर्शवली.

या गस्तीचे आणखी एक यश म्हणजे – महिला व मुलींच्या सुरक्षेविषयी समाजात नव्याने जागरूकता निर्माण झाली. काही बालिकांनीही सुरक्षिततेसाठी ‘मुक्ती वाहिनी’सारख्या सेवेची गरज असल्याचे नमूद केले. ही रात्र केवळ एका मुलीच्या बचावापुरती मर्यादित राहिली नाही, तर तिने एक व्यापक सामाजिक जाणीवा पुन्हा जागवल्या.

ही मोहीम स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, मानद संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर, संचालक हनिफ शेख, आणि प्रविण कदम (उडान प्रकल्प व्यवस्थापक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कार्यकर्त्यांमध्ये शाहिद शेख, सीमा जुनी, पूजा दहातोंडे, प्रवीण दरंदले, शुभम डहारे, निशा वाघ, पूजा डाकूआ, मयूर ठोंबे यांचा सक्रिय सहभाग होता.

 

‘मुक्ती वाहिनी’ ही सेवा केवळ टोल फ्री हेल्पलाइन नसून, संकटात असलेल्या प्रत्येक बालकासाठी २४x७ कार्यरत असलेली सजग आणि संवेदनशील व्यवस्था आहे. या यंत्रणेमार्फत तात्काळ वैद्यकीय मदत, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, सुरक्षित निवारा आणि पुनर्वसन हे सर्व उपलब्ध करून दिले जाते.

 

स्नेहालय मुक्ती वाहिनी माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर एखादा बालक संकटात, बेवारस अवस्थेत, भीतीत आढळल्यास तात्काळ ‘मुक्ती वाहिनी’ हेल्पलाइनवर 9011098008 / 9011026495 संपर्क साधावा. असे आवाहन स्नेहालय अनिवासी प्रकल्प विभागाचे संचालक हनिफ शेख यांनी केले.

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!