प्रशासकीयमहाराष्ट्रसंगमनेरसामाजिक

छत्रपती शिवरायांच्या कोणत्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही – डॉ.सुजय विखे पाटील 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य आश्वारूढ पुतळ्याचे उंबरी बाळापूर येथे अनावरण

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

आश्‍वी – उंबरी बाळापूर गावातील नागरीकांचे मागील अनेक वर्षांचे स्वप्न गावातील प्रत्येक जाती – धर्माच्या माणसाच्या योगदानातून आज पुर्ण होत आहे. हे स्मारक उभे करण्यात १५ ते ८० वर्षापर्यतच्या गावातील सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. आज गावात महाराजांच्या आगमनामुळे गावची शोभा वाढली असून गावातील अंतर्गत वादामुळे पुतळा बसवण्याचे पुण्यांचे व जबाबदारीचे काम विखे पाटील कटुंबाला मिळाले. त्यामुळे सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो आणि भविष्यात छत्रपती शिवरायांच्या कोणत्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्‍वारुढ पुतळ्याचे अनावरण डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. २६) सायंकाळी करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी भाजप, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई यासह सर्व लहान मोठ्या पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतून आलेले शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाबरोबरही होऊ शकत नाही. छत्रपती शिवराय हे आपले दैवत असून ते आपल्या हृदयात आहेत. महाराजाचे विचार हे बहुजन समाजाला एकत्र घेऊन चालण्याचे होते. त्यामुळे पुतळा उभारणीनतंर गाव विकासाच्या दिशेने नेताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे अनुकरण करुन करावे असे आवाहन केले.

आजचा कार्यक्रम हा कोणत्याही पक्षाचा नसून भाजप, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असे सर्व पक्षीय लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहे. त्यामुळे उंबरी बाळापूर ग्रामस्थांचे कौतुक करताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय जेव्हा असेल तेव्हा आमच्यामध्ये जात, धर्म आणि पक्ष आडवा येणार नाही हे सिद्ध केले असल्याचे गौरवोद्गार काढले. तर उंबरी बाळापूर नंतर कोल्हार आणि शिर्डी या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारत शिवसृष्टी तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

 

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात डॉ. विखे पाटील यांनी यावेळी निषेध केला. हा कार्यक्रम पक्षाचा नसला तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सुरक्षेसाठी जो निर्णय घेतील त्याला गावांचा पाठींबा द्या. असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थिताना केले असता सर्वाना भारत मातेचा जयघोष करत त्याला पाठींबा दिला.

 

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीवरुन गावात अंतर्गत वाद झाल्याचे सांगताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, “गाव जर ठरावीक रक्कम देऊन शांत होत असेल तर, आमच्या पैशाची किंमत आजिबात नाही. आमच्यासाठी कार्यकर्त्याची किंमत ही अधिक आहे. त्यामुळे गाव शांत राहिले पाहिजे. या दृष्टिकोनातून हे काम केले.” असे सांगून उंबरी बाळापूर गावातील इतर प्रश्नं देखील भविष्यात ताकदीने सोडवून कोणताही प्रश्नं प्रलंबित ठेवणार नसल्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!