महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची बारा वर्षे ही विश्वास, विकास आणि लोककल्याणाची सुवर्ण वर्षे ठरली- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची बारा वर्षे ही विश्वास, विकास आणि लोककल्याणाची सुवर्ण वर्षे ठरली असून, भारत देशाने नवी अर्थव्यवस्था आणि नवा आत्मविश्वास घेऊन यशस्वीपणे वाटचाल केली आहे. ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हा मंत्र केवळ कागदावर न राहता देशातील विकासात्मक वाटचालीतून प्रत्यक्षात उतरला असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कारकीर्दीस १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री विखे पाटील यांनी मागील १२ वर्षांत झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उतरेचे नितीन दिनकर प्रदेश पदाधिकारी प्रा.कोरडे उपमहापौर धनंजय जाधव नगरसेवक निखिल वारे याप्रसंगी उपस्थित होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम व दूरदर्शी नेतृत्वामुळे देशातील सामान्य माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. २५ कोटी लोक प्रत्यक्षात गरिबीच्या बाहेर आले असून, देशातील ८१ कोटी लोकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळाला आहे. केंद्र सरकारने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले असून, ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून ४.२७ लाख कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून १०.२ लाख कोटी रुपयांचे वितरण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

देशातील १२ कोटी कुटुंबांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळाला असून, ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांचा यामध्ये समावेश आहे. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, प्रधानमंत्री आवास योजनेतून आतापर्यंत ४ कोटी कुटुंबांना घरांची उपलब्धता करून देण्यात आली आहे.

 

केंद्र सरकारने नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य दिले असून, ३ कोटी ‘लखपती दीदी’ देशामध्ये निर्माण झाल्या आहेत. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १ कोटी लखपती दीदी बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मागील १२ वर्षांच्या कार्यकाळात देशातील अन्नधान्याच्या उत्पादनात ७० टक्के ही ऐतिहासिक वाढ झाली असून, अन्नदाता सक्षम आणि आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न आहेत. दूध उत्पादनातही मागील १० वर्षांत ६९.४ टक्के वाढ झाली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार ‘प्रत्येक थेंबातून अधिक पीक’ यासाठी १०९ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आले असून, पाण्याच्या बचतीबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. देशात आणि राज्यात नदीजोड प्रकल्पांना दिलेले प्राधान्य आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अपूर्ण कामांना मिळालेली गती याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.

 

देशात १.४६ लाख कि.मी. पर्यंतच्या महामार्गांची कामे, रेल्वेचे आधुनिकीकरण आणि देशातील १,३३७ रेल्वे स्थानकांना आधुनिक दर्जा मिळवून देण्यासाठी काम सुरू झाले आहे. १६४ हून अधिक वंदे भारत ट्रेन सध्या नागरिकांना सुविधा देत आहेत. देशामध्ये डिजिटल क्रांतीची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली झाली असून, यामुळे सामान्य माणसाच्या राहणीमानातील सुलभता वाढून जीवन अधिक सुकर झाले आहे. ६ कोटींहून अधिक लोक डिजिटल साक्षर झाले असून, युपीआय (UPI) व्यवहारांमध्ये १२ हजार पटींची वाढ झाली आहे. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत भारत देश आज जगात आघाडीवर आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वासही मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

 

‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून उत्पादन क्षेत्राला मोठे पाठबळ मिळाले असून, भारत देश आता सेमीकंडक्टर उत्पादनाचे जागतिक केंद्र बनला आहे. मोबाईल निर्मितीमध्येही भारत दुसऱ्या स्थानी आला आहे. संरक्षण उत्पादनांमध्ये देशाने मोठी प्रगती केली असून, या उत्पादनांचा निर्यातदार म्हणून आता भारत देशाची ओळख झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही संरक्षण उत्पादनाचा कार्यान्वित झालेला प्रकल्प हा स्टार्टअपला मिळालेल्या पाठबळाचे यश असल्याचे सांगून, देशातील स्टार्टअपची संख्या आता २.२३ लाखांच्या पुढे गेली आहे.वारसा आणि विकास यांची सांगड घालून मागील १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १,७०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि उज्जैनचे महाकाल लोक यांद्वारे केंद्र सरकारने लाखो भारतीयांच्या श्रद्धेचा सन्मान केला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!