
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
पुणतांबा – लोकनेते पद्मभूषण “डॉ. बाळासाहेब विखे पाटील हे केवळ नेते नव्हते, तर ग्रामीण समाजाचे शिल्पकार होते. शिक्षण, आरोग्य, शेती आणि सहकार क्षेत्रात त्यांनी अमूल्य योगदान दिलं. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांनी विकासाचा मार्ग मोकळा केला. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आजच्या तरुणांनी समाजहितासाठी काम केलं पाहिजे,” असे प्रतिपादन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पुणतांबा येथील प्राचार्य डॉ.अमीन सय्यद यांनी केलं.
महाविद्यालयात लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची जयंती अभिवादन कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणतांबा गावचे माजी पोलिस पाटील भागवतराव धनवटे होते.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. विखे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर पत्रकार संजय जोगदंड यांनी डॉ. विखे पाटलांचा राजकीय प्रवास उलगडत, खासदार आणि सहकार नेते म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. प्रमुख पाहुण्या म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड. संध्याताई थोरात यांनी आपल्या मनोगतातून डॉ. विखे पाटील यांच्या समाजकार्यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमात प्रा. नंदू सदाफळ, प्रा. शामा धनवटे, प्रा. तेजस्विनी धनवटे, प्रा. सीमा दळवी, प्रा. सलीम शेख प्रा. जयश्री निकम, प्रा. माधुरी मोकळ यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही आपले विचार व्यक्त करून डॉ. विखे पाटील यांच्या कार्यातून प्रेरणा घेतल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाबासाहेब म्हसे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि भावनिक वातावरणात पार पडला. शेवटी सर्वांनी डॉ. विखे पाटलांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रतिज्ञा घेतली.
