कोपरगाव तालुका

कोपरगाव रेल्वे स्थानकावर लांबपल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा; खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना व्यापारी महासंघाची मागणी

व्यापारी, साई भक्त, शेतकरी, विद्यार्थी आणि स्थानिक प्रवाशांची होतेय मोठी गैरसोय

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – शिर्डीच्या साईनाथांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची, तसेच कोपरगाव व परिसरातील व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि सामान्य नागरिकांची रेल्वे प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर कोपरगाव रेल्वे स्थानकावर अवलंबून असलेली सोय, सध्या काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे नसल्यामुळे खंडित झाली आहे. परिणामी, नागरिकांना मनमाड, बेलापूर किंवा पुणे यासारख्या इतर स्थानकांवर प्रवासासाठी जावे लागत आहे. ही गैरसोय लक्षात घेता कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्याध्यक्ष सुधीर डागा यांच्या हस्ते शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना कोपरगाव रेल्वे स्थानकावर लांबपल्ल्याच्या पाच महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे द्यावेत, अशी मागणी लेखी स्वरूपात करण्यात आली आहे.

 

ही मागणी व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष व कोपरगाव तालुका रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुधीर एस. डागा यांनी स्थानक प्रमुख भैरव प्रसाद यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात देखील मांडली आहे. या निवेदनाच्या प्रती कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे आणि कोपरगाव रेल्वे विभाग प्रमुख, अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

 

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कोपरगाव हे शहर सामाजिक, धार्मिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून झपाट्याने विकसित होत आहे. शिर्डीपासून अवघ्या १५ किमी अंतरावर असल्यामुळे साईभक्तांची मोठी गर्दी वर्षभर असते. त्याचप्रमाणे, कोपरगाव औद्योगिकदृष्ट्याही विकसित होत असून, अनेक शेतकरी, व्यापारी व व्यावसायिक दररोज रेल्वेने प्रवास करत आहेत. विद्यार्थ्यांसाठीही हे स्थानक अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे येथून देशाच्या विविध दिशांना जाणाऱ्या गाड्यांचा थांबा असणे आवश्यक आहे.

 

थांबा मागितलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे:

क्र. गाडीचे नाव गाडी क्रमांक

1. काकीनाडा एक्सप्रेस 17205 / 17206

2. सिकंदराबाद एक्सप्रेस 17001 / 17002

3. विजयवाडा एक्सप्रेस 17207 / 17208

4. कामायनी एक्सप्रेस 22455 / 22456

5. पाटलीपुत्र एक्सप्रेस 22223 / 22224

 

वरील गाड्यांचे थांबे कोपरगावसारख्या महत्त्वाच्या स्थानकावर नसणे ही दुर्दैवाची बाब असून, थांबा दिल्यास नागरिकांची प्रवास सुविधा अधिक सुकर होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

या मागणीसाठी श्री.भैरव प्रसाद, श्री. साईबाबा संस्थानचे प्रतिनिधी, तसेच कोपरगाव येथील विविध व्यापारी संघटना, रिक्षा संघटना आणि स्थानिक नागरीकांनीही आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व रेल्वे सल्लागार समितीच्या वतीने सांगण्यात आले की, व्यापारी, नोकरदार वर्ग, शेतकरी, प्रवाशांच्या हितासाठी ही मागणी तातडीने मान्य करून गाड्यांचे थांबे कोपरगाव स्थानकावर निश्चित करण्यात यावेत.

 

या मागणीला राजकीय पातळीवरही चालना देण्यात येणार असून, खासदार, आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधींना याबाबत माहिती देऊन लवकर निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे सुधीर डागा यांनी स्पष्ट केले. रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने पाहून कोपरगाव स्थानकावरील गाड्यांचे थांबे निश्चित करावेत, अशी अपेक्षा आता कोपरगावकर नागरिक आणि प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!