
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या अहमदनगर येथील इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (ITI) च्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या कॅम्पस मुलाखतींमध्ये उल्लेखनीय यश मिळवत, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांमध्ये यशस्वीरीत्या निवड मिळवली आहे.
ग्रामीण भागातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्य, मेहनत आणि संस्थेच्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाच्या आधारे औद्योगिक क्षेत्रात ठसा उमटवला आहे. एकूण ८८ विद्यार्थ्यांची निवड ही संस्था व विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या कॅम्पस ड्राइव्हमध्ये सहभागी झालेल्या कंपन्यांमध्ये काइनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स लिमिटेड, रेंज एक्स, श्रीजी प्रोसेस इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेड (अहिल्यानगर) आणि भवानी इंडस्ट्रीज प्रा. लि. (चाकण, पुणे) यांचा समावेश होता. इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, मेकॅनिक मोटर व्हेईकल आणि ड्राफ्ट्समन मेकॅनिकल या प्रमुख ट्रेड्समधील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
संस्थेचे प्राचार्य श्री. अनिल सूर्यवंशी म्हणाले,“आम्ही विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक शिक्षणच नव्हे तर सॉफ्ट स्किल्स, करिअर गाईडन्स आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन यांसारख्या कौशल्यांचेही प्रशिक्षण दिले. त्यामुळेच आमचे विद्यार्थी आत्मविश्वासाने आणि तयारीनिशी यश मिळवू शकले.”मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले,“हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, संस्थेच्या विश्वासार्हतेचे आणि ग्रामीण भागातील युवकांना सक्षम करण्याच्या आमच्या प्रयत्नांचे फलित आहे.”संस्था गेली तीन दशके विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. गुणवत्तापूर्ण औद्योगिक शिक्षणाच्या माध्यमातून, ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी तयार करण्याचे कार्य संस्था सातत्याने करत आहे.
या यशस्वी कॅम्पस ड्राइव्हसाठी जलसंपदा मंत्री व चेअरमन मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील, सीईओ डॉ. सुजय विखे पाटील, डायरेक्टर जनरल (प्रशासन) डॉ. पी. एम. गायकवाड, डायरेक्टर (टेक्निकल) सुनील कोल्हापुरे, डायरेक्टर (मेडिकल) डॉ. अभिजीत दिवटे, तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी अरुण म्हस्के आणि संपूर्ण ITI टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
