
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी (दि.२२)- कृषी पदवीधारकांनी त्यांच्या उपयोग कौशल्य आणि मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग शेती उत्पादन वाढी बरोबरच त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी करावा. उद्योजकतेला जोड देत असताना शेती व्यवसायातून शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करावे आणि या माध्यमातून शेती क्षेञाला चालना द्यावी अशी अपेक्षा कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांनी व्यक्त केली.
कृषि मंञालय भारत सरकार, मॅनेज हैंद्राबाद नाबार्ड पुणे आणि कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ॲग्री क्लिनिक आणि ॲग्री बिझनेस प्रशिक्षणनाच्या समारोपप्रसंगी डॉ. कदम बोलत होते. यावेळी पायरेन्सचे सचिव डॉ. निलेश बनकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दादासाहेब खोगरे, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, शांताराम सोनवणे, भरत दवंगे, डॉ. विलास घुले, डॉ. विठ्ठल विखे डॉ. प्रियंका खर्डे, संज्जला लांडगे आदींसह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.कदम म्हणाले शेती क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे हे विकसित तंत्रज्ञान पोहोचवण्यामध्ये कृषी उद्योजकांचा सहभाग हा महत्त्वाचा असणार आहे. शेतकऱ्यांना विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देत असताना शेतकऱ्यांना जास्तीचा नफा कसा मिळेल यासाठी कृषी उद्योजकांनीप्रयत्न करावा. संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रवरेचा विद्यार्थी हा नोकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांसाठी सुरू आहेत या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यामध्ये कृषी उद्योजकांचा वाटा महत्त्वपूर्ण ठरेल असेही त्यांनी सांगतानाच आपल्या व्यवसायातून शेतकऱ्यांसाठी काम करा हा संदेशही डॉ. कदम यांनी यावेळी दिला.
यावेळी डॉ. निलेश बनकर, डॉ. दादासाहेब खोगरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ४५ दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना विविध ठिकाणी प्रक्षेत्र भेटी, प्रत्यक्ष कार्यानुभावा द्वारे शिक्षण, विविध प्रकल्प अहवाल तयार करणे, विविध योजना, संवाद कौशल्य, मार्केटिंग जाहिरात तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा वापर आदी विषयावरती तज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामध्ये २६ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते यामध्ये महिला प्रशिक्षणार्थी महिला सहभाग हा मोठा होता.
संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ३३ प्रशिक्षणातून संपूर्ण राज्यामध्ये ॲग्री क्लिनिक आणिॲग्री बिजनेस च्या माध्यमातून कृषी उद्योजक घडवण्याचे काम कृषी विज्ञान केंद्राने करत आज देशात हे केंद्र अव्वल स्थानावर राहिले आहे. या माध्यमातून कृषी उद्योजकांनी स्वयंरोजगाराबरोबरच रोजगार निर्मिती केली आहे.
– डाॅ.दादासाहेब खोगरे
