
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील चितळी- वाकडी-धनगरवाडी परिसरात भक्ष्याच्या शोधात बिबट्यांचे मानवी लोकंवस्तीत दररोज दर्शन होत आहे वनविभाग बिबट्यांची दहशत मोडीत काढण्यास अपयशी ठरत आहे.वाकडी-दिघी रोड परिसरात एकाच आठवड्याच्या कालावधीत शेतकरी बाळासाहेब त्रिंबक शेळके यांच्या शेतात तिसरा बिबट जेरबंद झाला आहे.रविवारी (दि.२०) सायंकाळी घटना घडली.नागरिकांनी कोपरगाव वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला परंतु;वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांचा वेळेवर फोन घेवून दाद दिली नाही.शेवटी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी येण्यास विलंब झाला सोमवारी (दि.२१) सकाळी दहा वाजेच्या सुमारास वनविभागाचे एकमेव कर्मचारी पी.डी गजेवार घटनास्थळी दाखल झाले.यामुळे नागरिक संतप्त झाले याचदरम्यान (दि.२१) दुपारी चितळीगावातील प्रशांत वाघ यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे आढळून आले या घटनेची माहिती चितळीचे सरपंच नारायण कदम यांनी वन विभागाला दिली.शाळकरीविद्यार्थी,नागरिक,शेतकरी,दररोज भीतीचा सामना करत आहे.घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेवून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी वनविभागाला पत्र दिले असून परिसरातील बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याचे आदेश दिले आहे.
चितळीगाव-वाकडी-धनगरवाडी दिघी रोड सह जळगाव परिसरात सुद्धा बिबट्यांची जास्त प्रमाणात उत्पत्ती होत असून.वाड्या-वस्त्यांच्या रस्त्यावर बिबट दिसतात परिसरातील ऊस मका द्राक्ष डाळिंब बागेत दिवसा दबा धरून बसतात शिकार करण्याच्या हेतूने दुचाकी वाहनाचा पाठलाग करतात दिवसेंदिवस बिबट्याचे नागरिकांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे.शेतात तसेच वाड्या वस्त्यावरील नागरिकांना भयभीत झालेत वर्षभरात बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.बिबट्यांचा मानवी वस्तीत वाढलेला उद्रेक पाहता परिसरातील नागरिकात काळजीसह भय आणखी वाढले आहे.मानवाचा आणि बिबट्यांचा संघर्ष अटळ झालेला आहे.परिसरात ठिकठिकाणी अंदाजे १० पिंजरे लावले आहे.वनविभागाच्या ‘नाकर्तेपणावर’ परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला आहे.बिबट्याच्या उद्रेकाने अनावधानाने स्थानिकांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास महाराष्ट्र शासन वनविभागासह जनतेचे लोकप्रतिनिधी जबाबदारी स्विकारतील का..? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या ठिकाणी पिंजरे लावण्यासाठी सुद्धा नागरिकांनाच प्रयत्न करावे लागत आहे वनविभागाचे अधिकृत वाहन वेळेवर येत नाही.बिबट्यांना नेण्यासाठी खाजगी भाडोत्री वाहनाची भक्ष्याची व्यवस्था नागरिकांनाच करावी लागते.खाजगी वाहन असल्याने दोनशे ते चारशे किलोमीटर अभयारण्यापर्यंत जावू शकत नाही.त्यात जेरबंद झालेले बिबट वनविभागाकडून रेस्क्यू केल्यानंतर साधारणपणे दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर पुन्हा आसपासच्या परिसरात सोडले जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.परिसरात बिबट्याची अगणित संख्या असून वनविभागाने ड्रोनच्या साह्याने व कॅमेरे लावून बिबट्यांची संख्या मोजावी व त्यांना जेरबंद करावे.वनविभागाने काहीतरी ठोस उपाययोजना करून परिसरातील सर्वच बिबट्यांना जेरबंद न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
चितळी-धनगरवाडी -वाकडी दिघी रोड सह परिसरातील सर्वच वस्त्यांमधील ग्रामस्थांनी या गोष्टीचा धसका घेतला आहे.रात्री तर काय दिवसाही घराजवळ बिबट दर्शन देतात रस्त्याने जाताना जसे पाळीव श्वान दिसतात त्याच पद्धतीने दररोज बिबटे दिसतात ही मोठी चिंताजनक बाब मानली जावू लागली आहे.परंतु तरीही परिसरातील सर्व शेतकरी जीव मुठीत धरून शेतात कामे करतात.बिबट्याचा भक्षासाठी तर मानवाचा जीव वाचवण्यासाठीचा संघर्ष शिगेला गेलेला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चितळी व धनगरवाडी परिसरात दोन वेळा जीवितहानी देखील झाली आहे.विशेष बाब म्हणजे दोन्ही घटनेतील जीवघेण्या हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या अजूनपर्यंत जेरबंद झाला नसून अनेकदा वनविभागाने शर्तीचे प्रयत्न करून सुद्धा बिबट्याचा पत्ता लागत नाही.
