
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता-राहाता तालुक्यातील जळगाव-एलमवाडी परिसरातील सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांनी आतापर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी आवश्यक कागदपत्रे जमा केली आहेत. मात्र, उर्वरित ७० टक्के शेतकऱ्यांनी अद्याप नोट कॅमवर काढलेले पीक पाहणी फोटो,बँक पासबुक झेरॉक्स,आधार कार्ड झेरॉक्स,गट क्रमांक माहिती सह इतर कागदपत्रे सादर करणे बाकी आहे.जळगावचे सरपंच शिवाजीराव साबदे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ ग्रामपंचायत जळगाव व तलाठी कार्यालयात सर्व दस्तऐवज सादर करून पंचनाम्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन केले आहे.
संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा भयंकर फटका बसला असून, सोयाबीन, मका, ऊस तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. राहाता तालुक्यातील जळगाव व एलमवाडी परिसरात २७ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असुन जळगाव: ८८९ हेक्टर,एलमवाडी: १८५ हेक्टर एकूण १०७४ हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्यात बुडून नष्ट झाली असून, या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईसाठी शासनाने ठरवलेल्या निकषांनुसार ३० ऑक्टोबर २०२५ पासून प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ग्रामपंचायत जळगाव व तलाठी कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे. कागदपत्रे सादर करताना ग्रामपंचायत अधिकारी सतीश दिघे व तलाठी संजय डोके यांची भेट घेऊन प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी.सरपंच शिवाजीराव साबदे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की शासनाने दिलेल्या सर्व नियम व निकष वेळेत पाळल्यास नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळेल.




