
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोळपेवाडी – मतदार संघातील नागरिकांचे शासकीय कार्यातील कामे खोळंबून राहू नये यासाठी जनता दरबार सुरु केले आहेत. त्या माध्यमातून विविध शासकीय कार्यातील बहुतांश नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटत आहेत. परंतु अनेक नागरीकांचे गावांतर्गत अनेक कामे रखडलेली असतात हि कामे पूर्ण होण्यासाठी अशा नागरीकांना ज्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.ते सर्व कागदपत्रे एकाचवेळी सांगा. परंतु कामात चालढकल करण्यासाठी कागदपत्रांच्या आडून नागरीकांना त्रास देवू नका. नागरीकांचे गावांतर्गत प्रश्न वेळेत सुटले पाहिजे याची काळजी घ्या अशा अशा स्पष्ट सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील धामोरी येथे समस्या निवारण बैठकीत उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या ऐतिहसिक मताधिक्याबद्दल नागरीकांचे आभार मानण्यासाठी व शासकीय कार्यातील नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी धामोरी येथे विविध विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत समस्या निवारण बैठक व आभार दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघाचा विकास करणे हे माझे कर्तव्य असून त्या जबाबदारी बरोबरच नागरिकांचे शासकीय कार्यालयातील कामे मार्गी लावणे हि माझी जबाबदारी आहे. हि जबाबदारी पार पाडण्यासाठी व नागरीकांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जनता दरबार हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. परंतु जे नागरिक जनता दरबारात आपल्या समस्या घेवून येवू शकत नाही अशा नागरिकांसाठी त्याच्याच गावात येवून त्यांचे प्रश्न लवकरात लवकर कसे सुटतील यासाठी आभार दौऱ्याच्या निमित्ताने आवर्जून समस्या निवारण बैठक आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत त्यांनी गावातील नागरीकांच्या विकासाच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा व प्रश्न समजून घेतले. विकासाच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार असून राज्यात आपले सरकार असल्यामुळे उर्वरित विकासाचे सर्वच प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित नागरिकांना दिला व ऐतिहासिक मताधिक्य दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले.
यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी, नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, पुरवठा अधिकारी अमोल फोफसे, महावितरणच्या सहाय्यक अभियंता रंजना करसाळे, युनियन बँकेचे मॅनेजर प्रमोद पुरी, विस्तार अधिकारी बबन वाघमोडे, पंचायत समिती अभियंता अश्विन वाघ, राजेंद्र दिघे, कृषी सहाय्यक योगेश माळी, पशु संवर्धन अधिकारी संतोष मासाळ, तालुका आरोग्य सहाय्यक विरेंद्र वाकचौरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुषमा सांजेकर, मंडलाधिकारी जफार पठाण, तलाठी सौरभ धुमाने, कालवा निरीक्षक सोमनाथ गांगुर्डे, कृषी सहाय्यक सचिन कोष्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
