
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोळपेवाडी – गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी उन्हाळ हंगाम २०२४/२५ साठी उन्हाळी हंगामी पिके, बारमाही उभी पिके, चारा पिके, ऊस व फळबागा इत्यादी पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी सात नंबर पाणी मागणी अर्जावर पाणी देण्यात येणार असून गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सात नंबर पाणी मागणी अर्ज पाटबंधारे खात्याच्या संबंधित शाखा कार्यालयाकडे जमा करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, गोदावरी कालव्यातून एक रब्बी व दोन उन्हाळी असे एकूण तीन आवर्तन देण्याचा निर्णय राहाता येथे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. गोदावरी कालव्याचे आवर्तन सुरु असतांना येणाऱ्या अडचणी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मांडल्या आहेत त्या अडचणींची पाटबंधारे विभाग निश्चितपणे दखल घेईल त्यामुळे आवर्तन सुरु असतांना अडचणी येणार नाही.यावर्षी चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे धरण क्षेत्रात समाधानकारक पाणीसाठा आहे.
त्यामुळे असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करून तीन आवर्तनाचे चार आवर्तन करावे अशी मागणी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केलेली आहे. परंतु त्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांनी देखील सात नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी उत्साह दाखविणे तेवढेच गरजेचे आहे. यावर्षी उन्हाच्या झळा लवकरच जाणवू लागल्या आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असून सर्वच पिकांना पाण्याची नितांत गरज भासणार आहे. त्यामुळे ऐन भरात असलेल्या पिकांना वेळेवर पाणी मिळणे गरजेचे आहे जेणेकरून लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. त्यासाठी सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी ५ मार्च पर्यंत आपले पाणी मागणी अर्ज दाखल करणे गरजेचे आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाला पाणी वाटपाचे नियोजन करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज मुदतीच्या आत दाखल करून रीतसर पोहोच घ्यावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
