
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
वाकडी – बँक ऑफ महाराष्ट्रची वाकडी (ता. राहाता) शाखा चितळी येथे स्थलांतर करण्याच्या निर्णयाला वाकडी खंडोबाची गावातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत वाकडी येथील हनुमान मंदिरात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार वाकचौरे यांनी बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून ही शाखा स्थलांतरित करू नये, असा ठाम आग्रह व्यक्त केला.
ग्रामस्थांच्या वतीने बँकेच्या स्थलांतराविरोधात निवेदन देण्यात आले असून, ग्रामसभेच्या ठरावाद्वारेही विरोध दर्शवण्यात आला आहे. या सर्व निदर्शनांनंतरही बँकेने ११ जून २०२५ रोजी चितळी शाखेत वाकडी शाखा विलीन होणार असल्याचा फलक लावल्याचे निदर्शनास आले. यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी व व्यापाऱ्यांना यामुळे मोठी गैरसोय होणार आहे. गावात जवळपास ८००० खातेदार आहेत, यातील बहुतांश जण वयोवृद्ध व ग्रामीण भागातील असल्याने त्यांना वाकडी येथून चितळीपर्यंत येणे खूप कठीण होणार आहे.
खासदार वाकचौरे यांनी बैठकीत ग्रामस्थांना आश्वासन दिले की, ते स्वतः बँक मॅनेजर यांच्यासोबत बैठक घेणार असून, आवश्यक असल्यास ते आंदोलनातही सहभागी होतील. त्यांनी याप्रकरणी दिल्ली येथील अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून, लवकरच बँकेचे चेअरमन व एम.डी. यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
या बैठकीस प्रथम महिला सरपंच सौ. रोहिणीताई आहेर, बँक मॅनेजर रोहन अहिरे, कॅशियर आदमाने, शंकरराव लहारे, डॉ. वसंतराव लबडे, ट्रस्ट अध्यक्ष संजय शेळके, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके, माजी सरपंच अनिल शेळके, काँग्रेस उपाध्यक्षा सौ. शितलताई लहारे, बी.एल.आहेर, अॅड. बबलू लहारे, सुनील लहारे, सावळेराम आहेर, निलेश लहारे, नितीन एलम, कैलास लहारे, गंगाधर नारायणगिरे, कापसे ताई व महिला बचत गट, व्यापारी, शेतकरी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे आयोजन मच्छिंद्र भवर, रविंद्र शेळके व राजेंद्र लहारे यांनी केले होते.
