
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे नागरिकांचे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.शनिवारी (दि.२७) सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसाने दुसऱ्या दिवशी (दि.२८) दुपारी ११ वाजेपर्यंत सगळीकडे दाणादान केली.तालुक्यात सरासरी १५०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

राहाता तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.महसुल मंडळानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे नोंदला आहे: राहाता – १६७.३ मिमी, शिर्डी – १४७.८ मिमी, लोणी – १६६.५ मिमी, बाभळेश्वर – १२९ मिमी,पुणतांबा–१२६.८ मिमी,अस्तगाव – १६७.८ मिमी; एकूण राहाता तालुक्यात सरासरी १५०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.परतीच्या पावसाचा तालुक्यात सर्वत्र हाहाकार उडाल्यामुळे एन दिवाळीच्या वेळीच शेतकऱ्यांसमोर तोंडावर मोठे संकट उभे राहिले आहे.

राहाता-चितळी रस्त्यावरील आळंदी वढ्यावरील पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे संपर्क तुटला आहे.कोपरगाव-पुणतांबा मार्गावरील कातनाल्यावर पाण्याची पातळी वाढल्याने वाहतुकीला रस्ता ठप्प झाला आहे.राहाता तालुक्यातील विविध गावातील लहान-मोठे गावं तळे -नाले तुडुंब भरल्याने बहुतेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून याचा नागरिकांवर मोठा परिणाम झाला आहे.सध्याला सोयाबीन सोंगणी चालू असल्यामुळे खळे कारण्यासाठी साठवलेली सोयाबीन भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.मका, ऊस भुईसपाट होवून त्यासोबत इतर हंगामी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

चितळी-जळगाव परिसरातील अनेक सखल भागात पाणी साचले असून,लोकवस्तीमध्ये देखील पाण्याचा निचरा झाल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत.रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे वाड्या, वस्त्यांवर वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात व वर्ग खोल्यांपर्यंत पाणी साचल्याने मोठी दुविधा निर्माण झाली. तसेच आसपासच्या घरांमध्ये पाणी गेल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.

शिर्डी–पुणतांबा रस्ता, अस्तगाव–श्रीरामपूर रस्ता, तीसगाव – लोहगाव रस्ता, रामपूरवाडी – वाकडी रस्ता, रामपूरवाडी – एकरुखे रस्ता, एकरुखे – पिंपळवाडी रस्ता, साकुरी – नादुर्खी रस्ता, राहाता–एकरुखे रस्ता, हसनापूर–दुर्गापूर–दाढ रस्ता, चितळी–एकरुखे रस्ता, तीसगाव–भगवतीपूर रस्ता, वाकडी – पांढरी वस्ती रस्ता, रुई–शिंगवे रस्ता, रुई – शिर्डी रस्ता, अस्तगाव – चोळकेवाडी रस्ता, एकरुखे – अस्तगाव रस्ता, राहाता – रांजणगाव खुर्द रस्ता, अस्तगाव – पिंपरी निर्मळ रस्ता, पिंपरी निर्मळ – आडगाव रस्ता, पिंपरी निर्मळ – गोगलगाव रस्ता, पिंपरी निर्मळ – राजुरी रस्ता, रांजणखोल – चारी क्र.७ रस्ता, आडगाव – लोणी रस्ता (बैल बाजारजवळ), तीसगाववाडी – कडसकरवस्ती रस्ता, नांदूर बु – यादवमळा रस्ता आदी मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने गावांचा संपर्क तुटला होता.




