
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – शेतकऱ्यांना विना अट सरसकट कर्जमुक्ती जाहीर करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार (दि. १५) रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी हे निवेदन स्वीकारले.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी राज्य सरकारवर टीका करताना सांगितले की, निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा शासनाला विसर पडला असून शेतकऱ्यांची चेष्टा सुरू आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने वाकडी खंडोबाची (ता. राहाता) येथे राज्यव्यापी साखळी उपोषण व अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. शासनाने सर्व अटी रद्द करून सरसकट कर्जमुक्ती जाहीर करावी, अन्यथा शेतकरी संघटना व थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी निवेदनाची सविस्तर पाहणी करून शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली. अप्पर जिल्हाधिकारी श्री. कोळेकर कार्यालयात आल्यानंतर हे निवेदन तातडीने वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.निवेदन देताना विठ्ठलराव शेळके, सावळेराम आहेर, रेवणनाथ डोखे, संजय एलम, अनिल देवकर, पोपट जाधव, प्रभाकर एलम, रावसाहेब जाधव, नवनाथ (भैय्या) शेळके, राजेश शेळके, महेश लहारे, जालिंदर जाधव, सोमनाथ दरंदले, रवींद्र लहारे, संजय बी. लहारे, बी. एम. लहारे आदी शेतकरी उपस्थित होते.




